Kuch Kuch Hota Hai Completed 25 Years: १६ ऑक्टोबर १९९८ या दिवशी करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि करण जोहरच्या रुपाने नवा दिग्दर्शक बॉलिवूडला मिळाला. ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या दोन चित्रपटांनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा आहे. शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खानची ‘रोमँटिक हिरो’ ही इमेज ठळक करण्यात या सिनेमाचा सिंहाचा वाटा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कुछ कुछ होता है राहुल तुम नहीं समझोगे”, “कुछ कुछ होता है अंजली तुम नहीं समझोगी” या दोन संवादांचा विशिष्ट ठिकाणी केलेला वापर, शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या प्रेमाचा त्रिकोण, त्यांचं महाविद्यालयात एकत्र जाणं. काजोल (अंजली) शाहरुख खान (राहुल खन्ना) यांनी बेस्ट फ्रेंड्स असणं. मग राहुल आयुष्यात येणारी टीना (राणी मुखर्जी) त्यातून घडणारा प्रेम त्रिकोण आणि मग सुखद शेवट. अशी सगळी फक्कड भट्टी सिनेमांतून जमून आली होती. खरंतर बॉलिवूडला प्रेम त्रिकोण नवे नाहीत. ‘संगम’ या राज कपूरच्या सिनेमांपासून हिंदी सिनेसृष्टीत प्रेम त्रिकोणांवरचे चित्रपट तयार होत आले आहेत. मात्र ‘कुछ कुछ होता है’ वेगळा ठरला कारण सिनेमाचा लुक ट्रेंडी होता. २५ वर्षांपूर्वीच्या तरुणाईची भाषा सांगणारा त्यांना आपलंसं करणारा हा सिनेमा होता. जनरेशन झेड किंवा आत्ताची पिढी ही कदाचित त्या सिनेमाला नावं ठेवू शकते.. पण शाहरुख काजोलचा एक खास चाहता वर्ग आणि त्यात राणी मुखर्जीसारखी अभिनेत्री त्यांच्यासह असणं हे त्या वेळच्या तरुणाईला प्रचंड भावलं होतं.

गाणी हा सिनेमातला आणखी एक महत्त्वाचा प्लस पॉईंट

सिनेमातली गाणी ही या सिनेमाची जमेची बाजू. ‘ये लडका है दिवाना..’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कोई मिल गया, मेरा दिल गया’ ‘तुझे या द ना मेरी आयी’, ‘लडकी बडी अंजानी हैं’, ‘कबसे आये है तेरे दुल्हेराजा’ ही सगळीच गाणी श्रवणीय. ‘ब्रेक अप साँग’ वगैरे यायचं होतं तेव्हा प्रेमभंग झालेल्या अनेक तरुण-तरुणींचं विरह गीत हे ‘तुझे याद ना मेरी आयी’ हेच होतं. ‘मेरा पहला प्यार अधुरा रह गया…’ म्हणत धावत धावत रडणाऱ्या काजोलने त्यावेळी प्रेक्षकांनाही रडवलं होतं.

करण जोहरच्या मदतीला धावला सलमान

सलमान खानचा या सिनेमातला रोल शाहरुखच्या तुलनेत खूपच कमी होता. मात्र हा सिनेमा सलमानने कसा स्वीकारला याचाही किस्सा आहे. करण जोहर अमन मेहराच्या (सलमान खान) भूमिकेसाठी अनेक कलाकारांना भेटला होता. मात्र त्यांनी या सिनेमात शाहरुखच्या तुलनेत भूमिका छोटी असल्याने ती करायला नकार दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमन मेहराच्या भूमिकेसाठी करण जोहर आमीर खान, अजय देवगण आणि सैफ अली खान यांना भेटला होता. मात्र या तिघांनीही ही भूमिका नाकारली. ज्यानंतर एक दिवस सलमानने करणला घरी बोलवलं आणि आपल्या अंदाजात कुणी तुला त्या भूमिकेसाठी हो म्हटलं का विचारलं? त्यावर करण नाही म्हणाला. ज्यानंतर सलमान खानने स्क्रिप्ट ऐकली आणि ही भूमिका मी करतो असं सांगितलं. जर आमिर खानने या सिनेमात अमनची भूमिका केली असती तर शाहरुख खान आणि आमिर खान हे पहिल्यांदा एकत्र दिसले असते. मात्र त्या दोघांनी अद्याप एकही सिनेमा केलेला नाही.

कुछ कुछ होता है ने तेव्हा इतिहास घडवला

सहकलाकारांचा अभिनयही उत्तम

सिनेमात मुख्य महत्त्वाचे असतात ते सहकलाकारही. ‘कुछ कुछ होता है’ मध्ये सना सईद (छोटी अंजली), फरिदा जलाल, जॉनी लिव्हर, अर्चना पूरणसिंग आणि अनुपम खेर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. अर्चना पूरणसिंगने साकारलेली मिस ब्रिगेंझा ही भूमिका अजूनही चर्चेत असते. तसंच ‘कोई मिल गया’ या गाण्यात शाहरुख, राणी आणि काजोल या तिघांप्रमाणेच अर्चना पूरणसिंग आणि अनुपम खेर यांची धमालही आपल्याला खळखळून हसवते.

जावेद अख्तर म्हणाले होते चित्रपटाचं नाव डबल मिनिंग वाटतं

जावेद अख्तर यांना या सिनेमाची गाणी लिहिण्याची ऑफर करण जोहरने दिली होती. मात्र जावेद अख्तर यांनी ही ऑफर नाकारली.’कुछ कुछ होता है’ हे नाव मला डबल मिनिंग वाटतं आहे असं ते करणला म्हणाले होते. मात्र नंतर त्यांना ही ऑफर नाकारल्याचा नंतर जावेद अख्तर यांना पश्चात्ताप झाला असं करणने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

शाहरुखने कशी स्वीकारली ऑफर?

“चाहत सिनेमाचं शुटिंग सुरु होतं त्या सेटवर करण जोहर आला होता. त्याने मला स्क्रिप्ट ऐकवलं. त्यानंतर मला हे जाणवलं की हा सिनेमा लोकांच्या काळजाला भिडणारा आहे. स्क्रिप्टमध्ये काही बदल नक्की झाले. नंतर मी फार विचार केला नाही. लोकांना हा सिनेमा आवडणार हे मला कळलं होतं मी त्याच भावनेतून हा सिनेमा केला” असं शाहरुखने म्हटलं होतं.

राणी मुखर्जीला आलं होतं टेन्शन

“शाहरुख आणि काजोल यांची केमेस्ट्री लोकांना खूप आवडत होती. अशात माझी भूमिका लोकांना आवडेल का? असं टेन्शन मला आलं होतं. मात्र मी करणवर पूर्ण विश्वास ठेवला. करणने मला सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेव प्रेक्षक तुझी आणि शाहरुखची जोडीही स्वीकारतील. त्यानंतर काय घडलं ते तुम्हाला माहित आहेच.” असं राणीनेही सांगितलं होतं.

कुछ कुछ होता है मधलं एक दृश्य (फोटो-फेसबुक)

‘कुछ कुछ होता है’ साठी राणी मुखर्जी नव्हती पहिली चॉईस

करण जोहरने ‘टीना’च्या भूमिकेसाठी ट्विंकल खन्नाला निवडलं होतं. ट्विंकल खन्ना करणला आवडत होती. तिचं टोपण नाव टीना असल्याने या सिनेमातही करणने या पात्राचं नाव टीनाच ठेवलं. ट्विंकल खन्नाने सिनेमाला होकार दिला होता. ११ दिवस तिने शुटिंगही केलं. मात्र तिने हा सिनेमा अकराव्या दिवशी सोडला. त्यानंतर करणने टीनाच्या भूमिकेसाठी रविना टंडन, ऐश्वर्या राय, तब्बू, उर्मिला आणि करीश्मा कपूर या सगळ्यांनाही ऑफर दिली होती. मात्र कुणीही ती स्वीकारली नाही. त्यानंतर राणीला ही भूमिका मिळाली. राणी मुखर्जीचा आवाज हस्की आहे म्हणून करणला टीनाचे संवाद डब करायचे होते. मात्र नंतर तिचा तो आवाज आणि तिचा लुक हा लोकांना इतका आवडला की त्याने इतिहास घडवला.

तर असा हा सिनेमा पंचवीस वर्षांचा झाला आहे. या सिनेमाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात कायम आहेत. याचा प्रत्यय आला तो तीन दिवसांपूर्वीच. हा सिनेमा २५ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने पुन्हा रिलिज करण्यात येणार असल्याची घोषणा करणने केली. तसंच २५ रुपयांमध्ये तिकिट मिळणार असल्याचंही जाहीर केलं तेव्हा अवघ्या पाऊण तासात या सिनेमाचे शो हाऊसफुल झाले. मुंबईत तीन स्पेशल स्क्रिनिंग रविवारी करण्यात आली. त्यामुळे प्यार दोस्ती है सांगणाऱ्या सिनेमाची भुरळ प्रेक्षकांना किती पडली आहे हे वेगळं सांगायला नको.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie kuch kuch hota hai completed 25 years do you know the unknown things about it scj
Show comments