Ranbir kapoor in Ramayan : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘रामायण’ (Ramayan) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलरमधील रणबीरचा लूक पाहून चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुकेश छाब्रा यांनी प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीरच कसा योग्य आहे, याबाबतचा खुलासा केला आहे.

‘रामायण’ (Ramayan) चित्रपटातील प्रभू श्रीरामांच्या मुख्य भूमिकेसाठी रणबीरची निवड करताना कोणते निकष मांडण्यात आले होते याबद्दल सांगितलं आहे. मुकेश छाब्रा यांनी ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘रामायण’मधील रणबीरच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला आहे. मुकेश छाब्रा यांनी सांगितलं की, रामाच्या भूमिकेसाठी रणबीरच्या नावाची चर्चा होत होती. त्यानंतर (Ramayan) चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन तिवारी यांनी रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कसा योग्य आहे ते सांगितलं होतं. रणबीर एक अष्टपैलू अभिनेता आहे.

काय म्हणाले चित्रपटाचे दिग्दर्शक ?

चित्रपटातील कोणतंही पात्र साकारताना तुम्हाला फक्त उत्तम अभिनय करता येत असून चालत नाही, तर त्याबरोबरच तुम्ही कसे दिसताय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मुकेशने सांगितलं की, नितीन यांच्या मते, “रणबीरचा चेहरा प्रचंड शांत आहे. जेव्हा ‘रामायण’ चित्रपट करायचं ठरवलं होतं तेव्हाच प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी सर्वात आधी रणबीरचा चेहरा डोळ्यासमोर आला होता.” रणबीरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा अभिनय. ‘ॲनिमल’ (Animal ) आणि अशा बऱ्याच चित्रपटांत रणबीर ॲक्शन हिरो म्हणून दिसला. मात्र, असं असलं तरी रणबीरचा स्वभाव शांत आणि निर्मळ आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्याचं हेच सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा थिएटरमध्ये प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जातील तेव्हा त्यांना कळेल की, रामाच्या भूमिकेसाठी मी रणबीरची निवड का केली.

हेही वाचा : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारतोय ‘छावा’मध्ये औरंगजेबचे पात्र, तुम्ही ओळखलंत का?

सर्वसाधारणपणे पौराणिक किंवा सत्य घटनांवर आधारित चित्रपट सकारताना त्यातील पात्र आणि कलाकरांचा स्वभाव हा मिळता जुळता आहे का, हे पाहिलं जातं. ‘रामायण’मधील विविध पात्र साकारणारे सगळेच कसलेले कलाकार आहेत. प्रभू श्रीराम हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर साकारताना तो भव्यदिव्यचं वाटायला हवा आणि त्यात कोणत्याही चुका होणार नाही, यासाठी कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत तुम्हाला चित्रपट पाहताना दिसून येईल.

रणबीरच्या ‘संजू’ (Sanju) , ‘रॉकस्टार’ (Rockstar), ‘बॉम्बे वेलवेट’ (Bombay Velvet) आणि ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटांचे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा होते. त्यामुळे मुकेश म्हणतात की, “मी रणबीरचं काम खूप जवळून पाहिलं आहे, त्यामुळे रामाच्य़ा भूमिकेसाठी तो अगदी योग्य आहे.” चित्रपटात सीतेच्या भूमिकेत सई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता यश, तर हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि कैकईचं पात्र लारा दत्त यांनी साकारलं आहे.

हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. मुकेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटासाठी VFX आणि तांत्रिक बाजू भक्कम करण्यावर जास्त भर दिला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ८३५ कोटींचे असल्याची चर्चादेखील होत आहे, त्यामुळे हा चित्रपट यंदाच्या वर्षातला सर्वात महागडा चित्रपट ठरू शकतो.