‘शक्तिमान’, ‘महाभारत’मधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मुकेश खन्ना होय. ही ओळख मिळण्याआधी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. मात्र, त्यांना अमिताभ बच्चन यांची कॉपी म्हटले जाऊ लागले.

काय म्हणाले मुकेश खन्ना?

मुकेश खन्ना यांनी ‘बॉलीवूड ठिकाणा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “लोक मला अमिताभ बच्चनची कॉपी म्हणत असत, त्याचा मला त्रास होत असे. जेव्हा मी १९८१ मध्ये ‘रुही’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हापासूनच मला अमिताभ बच्चनची कॉपी असल्याचा टॅग मिळाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘दर्द-ए-दिल’ आणि ‘कॅप्टन बॅरी’ हे चित्रपट पाहिल्यानंतरदेखील हेच म्हटले गेले.

“एकदा मिथुन चक्रवर्ती यांना ‘गरिंबो का अमिताभ बच्चन’ म्हटले गेले होते, त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली माहीत नाही, पण मी असतो तर ‘शांत बसा’ असे म्हटले असते. मला लोक म्हणत असत की तुम्ही अमितजींसारखे दिसता, तुम्ही त्यांना कॉपी करता. माझे चित्रपट ओळीने फ्लॉफ ठरले, त्यामुळे लोकांनी मला तसे म्हटले. इथे फक्त यशाचा बोलबाला होतो. जेव्हा ‘महाभारत’ प्रदर्शित झाले, तेव्हा कोणीही मला अमिताभ बच्चनची कॉपी असल्याचा टॅग दिला नाही. माझ्या करिअरच्या प्रवासात हे माझ्याबरोबर अनेकदा घडले आहे. मला आठवते, अमिताभ बच्चनशी बरेच साम्य असल्यामुळे माझ्या कारकिर्दीला उतरती कळा लागली अशा अर्थाचे अनेक आर्टिकल तेव्हा येत असत.”

अमिताभ बच्चन यांनी तुम्ही त्यांची कॉपी करता असे म्हटले होते का? यावर बोलताना मुकेश खन्नांनी होकार देत सांगितले, “अमितजींनी तसे म्हटले होते, पण मी त्यामुळे फ्लॉफ ठरलो का? अमितजी माझ्या करिअरला थांबवू शकत नाहीत. माझ्या एका मित्राने मला सांगितले होते, तो अमितजींबरोबर चित्रपट पाहत होता. जेव्हा जाहिरात आली आणि ती त्यांनी पाहिली तेव्हा त्यांनी म्हटले, हा माझी कॉपी करतो. अनेक वर्षांनंतर काही यूट्यूबर्सनी हे वाक्य वापरत लिहिले, “अमितजींच्या एका वाक्याने माझे करिअर संपले.”

हेही वाचा: पंढरीनाथच्या Elimination मुळे मराठी अभिनेत्रीला धक्का; जान्हवीचं नाव घेऊन ‘बिग बॉस’ला थेट सवाल, म्हणाली…

“प्रत्येक अभिनेता इतर कोणत्यातरी अभिनेत्याकडून प्रेरणा घेत असतो. मनोज कुमार, राजेंद्र कुमार यांच्यावर दिलीप कुमार यांचा मोठा प्रभाव होता. दिलीप साहेब हे शाहरुख खानचेदेखील प्रेरणास्थान आहे. अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या भूमिका प्रेरित होत्या आणि का असू नयेत. जेव्हा तुम्ही काहीतरी पाहता त्यातून काहीतरी शिकत असता, यामध्ये गैर काही नाही; पण जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रपटात मिमिक्री करायला जाता तेव्हा तुमचा नाश होतो. पण मी हे केले नाही”, असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.