‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत बजेट वसूल केलं आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेजमध्येही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाचे सहा दिवसाचे कलेक्शन किती ते जाणून घेऊयात.
‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ८१.२५ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने ७.४० कोटींचा व्यवसाय केला. ‘सॅकनिल्क’च्या, ट्रेंड रिपोर्टनुसार, या सिनेमाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ८.४३ कोटी रुपयांची कमाई केली. ‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०.०४ कोटी झाले होते.
कोकणातील ‘मुंज्या’ने चौथ्या दिवशी केली दमदार कमाई, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
‘मुंज्या’ चित्रपटाने सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर पाचव्या दिवशी ‘मुंज्या’ने ४.१५ कोटी रुपये कमावले. आता या चित्रपटाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ ने रिलीजच्या सहाव्या दिवशी ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘मुंज्या’चे सहा दिवसांचे एकूण कलेक्शन आता ३१.१५ कोटी रुपये झाले आहे.
‘मुंज्या’ चित्रपटाचं बजेट ३० कोटी रुपये आहे. बजेटची रक्कम या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या सहा दिवसांत वसूल केली आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या सहा दिवसांत चित्रपटाने ३१.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता तो एक आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेटची रक्कम वसूल करेल, असे अंदाज वर्तवले जात होते ते खरे ठरले आहेत.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. कोकणातील लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.
“मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, त्यामुळे मराठी लोककथेवर आधारित चित्रपटाला मिळणारं इतकं प्रेम पाहून आणि लोक त्याचं कौतुक करत आहेत हे पाहणं खूप छान वाटतंय. महाराष्ट्रीय लोककथा राष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत आणि त्यावर बनलेला एक चित्रपट हिट होतोय, हे पाहून मला खूप आनंद होतोय,” असं या चित्रपटाच्या यशावर अभिनेत्री शर्वरी वाघ म्हणाली.