Nana Patekar Daily Routine in Village : अनेक दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेले नाना पाटेकर मुंबईत राहत नाहीत. ते फक्त चित्रपटाच्या शूटिंग, प्रमोशन व सिनेमांशी संबंधित कामासाठी मुंबई व इतर ठिकाणी जातात. नाना एका गावात स्थायिक झाले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये नाना यांनी गावात राहण्याचा अनुभव अमिताभ बच्चन यांना सांगितला होता.

‘आपण गावातच राहायला हवं, असं तुम्हाला कधी वाटलं?’ असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारल्यावर नाना म्हणाले, “मी इंडस्ट्रीतला नाहीच, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो आणि परत गावी जातो. मी गाव-खेड्यात राहतो आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरं वाटतं.” नंतर नाना पाटेकर प्रेक्षकांना उद्देशून म्हणाले, “मी बच्चन यांना विचारलं की, ‘तुम्ही इतकं काम का करता? गावात येऊन आठवडाभर राहा. तिकडे फारच निवांत वाटतं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, ते दिवासातले १२ तास काम करतात. या गोष्टीसाठी मी त्यांच्यापुढे खरंच नतमस्तक आहे.”

नाना पाटेकरांचं बोलणं ऐकून बिग बी म्हणाले, “असं वाटतं की पुन्हा त्या वातावरणात जाऊन राहावं. आता मी समजू शकतो की तुम्ही परत का गेलात!” त्यानंतर बच्चन यांनी नाना पाटेकरांना विचारलं की, गावातली त्यांची दिनचर्या कशी असते. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवले आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. तिथे मीच सगळं काही करतो. नाश्ता, जेवण – माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरंच चांगलं जेवण बनवतो.”

नाना म्हणतात, अभिनयात करिअर केलं नसतं तर…

“कधी कधी तर मला वाटतं की, जर मी चित्रपटांमध्ये करिअर करू शकलो नसतो, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिलंय. माझ्या गरजा अगदी साध्या आहेत. संध्याकाळी, माझ्या सोबतीला पुस्तकं असतात. काही मी वाचली आहेत, काही वाचलेली नाहीत. चार पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगर आहेत. मी डोंगरांमध्ये राहतो. तिथलं आयुष्य खूप सोपं आहे. तिथे अलार्मसाठी घड्याळ लागत नाही. सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे कधीकधी मोरसुद्धा येतात,” असं नाना म्हणाले होते.

nana patekar
नाना पाटेकर (फोटो – फेसबूक)

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली नाना पाटेकरांच्या घरी जायची इच्छा

नाना पाटेकरांनी गावाचं केलेलं वर्णन पाहून अमिताभ बच्चन भारावले होते. “कधी तरी यायलाच हवं तुमच्याकडे,” असं बिग बी नानांना म्हणाले. त्यावर “अर्थात. नक्की या. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की हे घर माझ्या एकट्याचे नाही. ते तुमचेही आहे. तुमचंच घर समजून या आणि राहा,” असं म्हणत नाना यांनी बिग बींना घरी यायचं आमंत्रण दिलं.