सोशल मीडियावर आपल्याला रोज सेलिब्रिटींचे फोटोज व व्हिडीओ पाहायला मिळतात. कुणी कुटुंबाबरोबर एखाद्या हॉटेलमधून बाहेर पडताना, कुणी विमानतळावर तर कुणी जिम, ब्यूटी पार्लर वा इतर ठिकाणी दिसतात. हे व्हिडीओ रेकॉर्ड करणारे पापाराझी असतात. या पापाराझींना कसं कळतं की हे सेलिब्रिटी कुठे आहेत? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना आणि सेलिब्रिटींनाही पडतो. बरेच जण त्यांना कॅमेऱ्यासमोर याबद्दल प्रश्नही विचारतात. सेलिब्रिटी कुठे आहेत, याची माहिती कशी मिळते, याचा खुलासा एका पापाराझोने केला आहे.

सर्वात जुन्या बॉलीवूड पापाराझोपैकी एक वरिंदर चावलाने अलीकडेच ‘बॉलीब्लाइंड्स गॉसिप’वर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं. यामध्ये सेलेब्स कुठे आहेत, हे कसं कळतं याबद्दल विचारलं असता तो म्हणाला की त्यांना रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडून टिप मिळतात. इतकंच नाही तर भिकाऱ्यांकडूनही टिप मिळतात. “आम्ही गाड्यांचा पाठलाग करतो. आम्हाला काही मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील वेटर्सकडून टिप्स मिळतात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुंबईत अनेक भिकाऱ्यांकडे आमच्या स्टाफचा नंबर आहे आणि तेही फोन करून सांगतात,” असं त्याने सांगितलं.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

सर्वात जास्त आणि सर्वात कमी आवडत्या सेलिब्रिटींबद्दल विचारलं असता चावला म्हणाला, “माझ्या ऑल टाइम फेव्हरेट स्टारच्या यादीत रणवीर सिंग, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, करीना कपूर यांचा समावेश आहे आणि सर्वात कमी आवडत्या स्टार्स तापसी पन्नू आणि जया बच्चन आहेत.” जया बच्चन पापाराझींना अनेकदा रागावताना दिसतात, त्यामुळे या उत्तराचं चाहत्यांना आश्चर्य वाटलं नाही. तसेच बऱ्याचदा तापसी पन्नूही पापाराझींवर चिडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

या आठवड्यात OTT वर रिलीज झालेले चित्रपट अन् वेब सीरिजची यादी

सर्वाधिक मागणी कोणाच्या फोटो व व्हिडीओंना असते, याचा खुलासाही वरिंदरने केला. सैफ अली खान व करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूरचे फोटो आणि व्हिडीओंना सर्वात जास्त मागणी असते, असं वरिंदर चावलाने सांगितलं. “त्याच्या फोटो व व्हिडीओची मागणी इतकी वाढली की आम्ही त्याला २४/७ फॉलो करू लागलो. तो शाळेत किंवा ट्यूशनला जात असेल तर आम्ही तिथेच असायचो. तो खेळत असतानाही आम्ही त्याच्या मागे जाऊ लागलो. आम्ही त्याच्या खासगी जीवनात अडथळा आणत होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला शाळा आणि ट्यूशन यांसारख्या काही ठिकाणी त्याचा पाठलाग न करण्याची विनंती केली,” असं वरिंदर चावला म्हणाला.