Adipurush Review : “कावळ्याच्या हाती दिला कारभार अन् त्याने घाण करून सोडला दरबार” आदिपुरुष पाहून झाल्यावर कदाचित हीच भावना आपल्या मनात येऊ शकते. याचा अर्थ या चित्रपटाच्या निर्मात्यांना कावळ्याची उपमा देऊन त्यांच्या कुवतीवर प्रश्नचिन्ह उभं करायचा अजिबात हेतू नाही. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे उत्तम अन् सुजाण कलाकार आहेत यात काहीच शंका नाही. त्यांची बरीच कामं आपण याआधी पाहिली आहेत, पण ‘रामायण’सारख्या महाकाव्याला न्याय देण्यासाठी ही मंडळी समर्थ नसल्याने ही म्हण वापरावी लागत आहे. बघायला गेलं तर ओम राऊतकडे एक खूप मोठी संधी होती. या चित्रपटाचं अभूतपूर्व असं सादरीकरण करून रामानंद सागर यांच्याप्रमाणे आपलं नाव इतिहासात कोरून ठेवण्याची ताकद त्यात होती, पण या संधीचा योग्य वापर न केल्यानेच या चित्रपटाच्या निर्मात्यांवर ही वेळ आली आहे असं मला वाटतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रामायण’ कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण आज ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चित्रपट कसा आहे त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत पण चित्रपटाबद्दल जी भीती वाटत होती ती खरी ठरल्याने माझ्यासारखे कित्येक लोक आज चित्रपटगृहातून निराश होऊन बाहेर पडताना बघून वाटलं ओम राऊतनी हा चित्रपट करायचा अट्टहास का केला असावा? मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडताना स्वतःला काही मर्यादा घालाव्यात असं ओम राऊतला का वाटलं नाही?

आणखी वाचा : Bloody Daddy Review : करोना, ५० कोटींचे ड्रग्स अन् एका रात्रीची गोष्ट; जाणून घ्या कसा आहे शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’

अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यायला ओम राऊत आणि या चित्रपटाशी जोडलेला प्रत्येक कलाकार बांधील आहे कारण या चित्रपटातून त्यांनी लाखो करोडो लोकांच्या श्रद्धास्थानाला धक्का लावायचा प्रयत्न केला आहे. गोष्ट फक्त सिनेमॅटीक लिबर्टीची नाहीये आणि कोणाच्याही कल्पकतेवर बोट ठेवायचा उद्देशही नाही पण किमान आपण काय दाखवत आहोत याचा सारासार विचारही या कलाकारांना करावासा वाटला नाही याचा खेद आहे.

चित्रपटाची सुरुवातच रावणाला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानापासून होते. प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता अन् भाऊ लक्ष्मणासह आयोध्या सोडून वनवासाला निघतात इथवरची गोष्ट तर चित्रपटाच्या सुरुवातीच्या टायटल्समध्ये आटोपण्यात आली आहे. या प्रकारामुळे जरी आपल्या प्रत्येकाला रामायण तोंडपाठ असलं तरी एक चित्रपट म्हणून त्यातील कथानकाशी जोडले जात नाही. केवळ त्या तिघांचा वनवास ते रावणाला हरवून सीतेला परत आणायची कथा दाखवण्यासाठी ओम राऊतने प्रेक्षकांच्या जीवनातील ३ तास अन् स्वतःच्या आयुष्यातील असे अनेक तास वाया घालवले आहेत हेच आपल्याला जाणवतं.

या चित्रपटाच्या कथेबद्दल बाकी काही वेगळं सांगायची गरज नाही असं वाटतं. आपण ‘रामायण’ हे महाकाव्य काही क्षणापुरतं बाजूला ठेवलं अन् याकडे एक काल्पनिक कथा म्हणूनही बघायचं ठरवलं तरीही ते तितकंच असहनीय वाटेल. बाकी ५०० कोटी खर्च करून केजीएफच्या खाणीसारखी काळी कुट्ट लंका, चित्रविचित्र अन् किळसवाणे असे उडणारे जीव अन् ड्रॅगनसदृश प्राणी, मंदोदरीसमोर मद्याचे घुटके घेत बदल्याची भाषा बोलणारी शूर्पणखा, मुन्नाभाईसारखा चालणारा रावण अन् त्याची बीभत्स सेना, इंद्रजीत, कुंभकर्ण, सुग्रीव यांचं हास्यास्पद चित्रीकरण, अन् अशा अनेक गोष्टी ओम राऊतने दाखवून चित्रपटाची माती केलीच आहे. शिवाय क्लायमॅक्सला पडद्यावर चाललेली सर्कस पाहून प्रेक्षक कायमचे डोळे मिटून घेतली इतकी भयावह आहे. या सगळ्या गोष्टीही लोकांनी सहन केल्या असत्या जर त्या प्रभावीपणे पडद्यावर मांडल्या असत्या. इथे मात्र VFX च्या नावावर जे काही दाखवलं गेलं ते पाहता एखादा यूट्यूबरदेखील ग्रीन स्क्रीन वापरुन उत्तम काम करू शकतो यावर आपला विश्वास बसेल.

इंद्रजीत जेव्हा हनुमानाच्या शेपटीला आग लावतो तेव्हा त्यांच्यातील डबल मीनिंग डायलॉगबाजी ऐकून तर काही क्षण फरहाद सामजीचा चित्रपट सुरू आहे का असा भास होतो. मनोज मुंतशीरसारख्या जाणकार व्यक्तीने जर हे संवाद लिहिले असतील तर यावर काही न बोललेलंच बरं. संगीत, पार्श्वसंगीत यथातथाच आहे, ‘जय श्रीराम’ हे गाणं सोडलं तर बाकी कोणतीही गाणी लक्षात ठेवण्यासारखी नाहीत.

अभिनयाच्या बाबतीत फक्त देवदत्त नागे अन् क्रीती सेनॉन यांचीच कामं बरी झाली आहेत. सैफ अली खानचा रावण म्हणजे खिलजी अन् उदयभान यांचं मिश्रण आहे, चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा तो शंकराची आराधना करतानाचा एक सीन सोडला तर बाकी कशातही तो रावण वाटत नाही. प्रभासने बहुदा ‘बाहुबली’मधून कधीच बाहेर पडणार नाही हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सनी सिंगला चित्रपटात काहीच करायला वाव नाही कारण संपूर्ण फोकस हा ठोकळ्यासारखा चेहेरा ठेवून संवाद वाचणाऱ्या प्रभासवर आहे. बाकी इतर काही भूमिकांमध्ये मराठी अभिनेत्रींचीची झलक पाहायला मिळते.

आणखी वाचा : प्रभासचा ‘आदिपुरुष’ मोडणार शाहरुख खानच्या ‘पठाण’चे रेकॉर्ड; सिनेतज्ञांनी वर्तवला अंदाज

जे अपेक्षित होतं अगदी तेच चित्रपटात पाहायला मिळाल्याने माझातरी भ्रमनिरास झालेला नाही कारण मुळात या कलाकृतीकडून मी फारशा अपेक्षा ठेवलेल्याच नव्हत्या. तुम्हीसुद्धा फार अपेक्षा ठेवल्या नसतील तर ३ तासांचा हा ‘असहनीय’ चित्रपट ‘सहन’ करू शकता. ‘आदिपुरुष’ हा रामायणासारख्या महाकाव्यातील केवळ काही निवडक प्रसंग घेऊन प्रेक्षकांची दिशाभूल करणारा चित्रपट आहे आणि त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं तरच बरं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas and kriti sanon starrer adipurush film review in marathi avn
Show comments