अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) सध्या बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक चित्रपट ‘स्त्री २’चे यश साजरे करत आहे. श्रद्धा कपूरबरोबरच्या ‘स्त्री २’ या सिनेमाने जगभरात ८०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राजकुमारच्या पत्नीने त्याला भेटण्याआधी त्याच्याविषयी असलेले तिचे मत, त्यांची पहिली भेट कशी झाली आणि त्याविषयीचे मतपरिवर्तन कसे झाले, यावर भाष्य केले आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा (Patralekhaa) त्यांच्या चाहत्यांसाठी आदर्श कपल आहे. त्यांच्या प्रेमाचा प्रवास खूप अनोखा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ बरोबर बोलताना पत्रलेखाने राजकुमारबरोबरच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आणि ती पहिल्या भेटीत त्याला खूपच विचित्र समजत होती, असे तिने उघड केले.

हेही वाचा…आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून सासूबाई नीतू कपूर म्हणाल्या, “अंगावर शहारे…”

पहिल्या भेटीत तो मला खूपच विचित्र वाटला होता

पत्रलेखाने राजकुमारबरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगताना म्हटलं की तिने कधीच कल्पनाही केली नव्हती की, तो एवढा यशस्वी अभिनेता होईल. ती म्हणाली, “मी तेव्हा त्याचा नुकताच ‘एलएसडी’ (लव्ह सेक्स और धोका) चित्रपट पाहिला होता. राजकुमारचा तो पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तीन दिवसांनी माझ्या शाळेच्या मैत्रिणीने मला एका म्युझिक व्हिडिओसाठी विचारले, ज्यामध्ये राजकुमारदेखील असणार होता. पण, मी तिला स्पष्ट नकार दिला कारण मला राजकुमार एलएसडी सिनेमामुळे फार विचित्र वाटला होता आणि मी घाबरले होते. त्यावर ती मला म्हणाली की घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासाठी कार पाठवू आणि तुझ्या बरोबर तुझ्या बहिणीला घेऊन ये. मी म्हटलं, ‘ठीक आहे, पाहूयात’.”

तो मुंबई ते पुणे प्रवास

पत्रलेखा पुढे म्हणाली, “त्या चित्रीकरणाच्या दिवशी मी माझ्या बहिणीला बरोबर घेऊन गेले. माझ्या बहिणीला माझ्या आणि राजकुमारच्या मध्ये बसवलं. पण, राजकुमार आणि ती गप्पा मारू लागले . मला अजूनही त्याच्याशी बोलायचं नव्हतं, कारण तो मला विचित्र वाटत होता. मात्र, प्रवास लांबचा होता, त्यामुळे शेवटी त्याने मला विचारले, ‘तू काय करतेस?’ मी सांगितलं, ‘मी काही जाहिराती केल्या आहेत.’ हे ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर अचानक बदल झाला, आणि त्याने मला सांगितलं की त्याने माझी एक जाहिरात पाहिली होती.”

हेही वाचा…लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”

ही तीच जाहिरात होती, ज्यामुळे राजकुमारला वाटलं होतं की, ‘मला या मुलीशी लग्न करायचं आहे’. राजकुमारने अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे.

आणि माझं मत बदललं – पत्रलेखा

राजकुमारबद्दल आपलं मत बदलण्याचं कारण सांगताना पत्रलेखा म्हणाली की, म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान तीन दिवस त्याच्यासोबत घालवल्यानंतर तिला समजलं की, राजकुमार एक वेगळा माणूस आहे. तो कलाविश्वावर प्रेम करणारा आणि आपल्या कामाबद्दल प्रचंड उत्कट असलेला व्यक्ती आहे. त्यानंतर हळूहळू तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं.

हेही वाचा…Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

११ वर्षांच्या प्रेमकहाणीचे लग्नात रूपांतर

राजकुमार आणि पत्रलेखाने जवळपास एक दशक एकमेकांना डेट केलं आणि अखेर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली.