बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत; ज्यांचं नाव ऐकताच प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतात. त्यापैकी एक म्हणजे राम गोपाल वर्मा. एकेकाळी राम गोपाळ वर्मा यांनी ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या चित्रपटांना पहिल्यासारखं यश मिळालं नाही. अलीकडेच त्यांचा ‘सत्या’ चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित केला. अभिनेते मनोज बाजपेयी, शेफाली शाह, उर्मिला मातोंडकर आणि जे. डी. चक्रवर्ती यांसारखे अनेक कलाकार असलेला ‘सत्या’ चित्रपट काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांनी स्वतः पाहिला. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम गोपाल वर्मा यांनी एक्सवर लिहिलं, “दोन दिवसांपूर्वी मी ‘सत्या’ चित्रपट २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच बघत होतो. तेव्हा चित्रपट संपताना माझा कंठ दाटून आला होता. कारण माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मला अजिबात काहीही वाटतं नव्हतं की, मला कोणी बघतंय की नाही. हे अश्रू चित्रपटासाठी नाहीतर ‘सत्या’ प्रदर्शित झाल्यानंतर काय-काय घडलं त्यासाठी होते.”

“एक चित्रपट करणं हे एका मुलाला जन्म देण्यासारखं आहे. ‘सत्या’ चित्रपट दिग्दर्शित करत असताना मी काय करतोय, याची मला कल्पना नव्हती. पण, जेव्हा दोन दिवसांपूर्वी स्क्रिनिंगवरून हॉटेलवर परतलो, तेव्हा मला जाणवलं. ‘सत्या’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर मी हॉटेलमध्ये अंधारात बसलो होतो. तेव्हा माझ्या तथाकथित बुद्धिमत्तेच्या जोरावर मी भविष्यात जे काही केलं त्याचा बेंचमार्क हा चित्रपट का बनवला नाही, हे मला समजलं नाही. मला देखील जाणवलं की, मी त्या चित्रपटात दाखवलेल्या शोकांतिकामुळे रडलो नाही, तर मी केलेल्या चित्रपटाच्या आनंदात रडलो. शिवाय मी माझ्या विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वासघात केला, यामुळे रडलो.”

“‘सत्या’ चित्रपटाच्या यशानंतर दारुची नशा चढली होती. मी अहंकारात राहत होतो, याचीदेखील जाणीव झाली. ‘सत्या’ चित्रपटाची यशाची हवा डोक्यात गेली होती. या यशाच्या प्रकाशाने मला आंधळ केलं होतं. मी चित्रपट बनवण्यात का भरकटलो, याची मला जाणीव झाली. आता काळाच्या मागे जाऊ शकत नाही आणि मी जे काही केलं ते बदलू शकत नाही. पण भविष्यातल्या प्रत्येक चित्रपट बनवण्याआधी ‘सत्या’ नक्की बघणार, जेणेकरून आगामी चित्रपट चांगले करू शकेल. उर्वरित आयुष्यात ‘सत्या’ चित्रपटासारखं काहीतरी करेन, असा मी अखेर पवित्रा घेतला आहे.”

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून राम गोपाल वर्मा बरेच चित्रपट करत आहेत. पण, हे चित्रपट पाहून त्यांचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करत असतात. त्यांनी हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपट देखील केले. त्यांच्या ‘सरकार’, ‘शिवा’, ‘वीरप्पन’, ‘कंपनी’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.