सैफ अली खानचा ‘देवरा: पार्ट १’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात सैफने खलनायकाची भूमिका साकारली असून, त्याने या सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. सैफने याआधी ‘आदिपुरुष’ या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. या सिनेमावर बऱ्याच टीका झाल्या होत्या, तर सैफला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आणि ‘तांडव’ या वेब सीरिजवर खूप टीका करण्यात आली होती. सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ सिनेमात रावणाची भूमिका केली होती. त्यावेळी झालेल्या वादावर सैफने नुकतंच भाष्य केलं आहे.

हेही वाचा…‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात

‘तो’ प्रसंग थोडा अस्थिर करणारा होता

‘आदिपुरुष’मध्ये सैफने रावणाची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या वेळी सैफवर खूप टीका करण्यात आली होती. यामुळेच हा प्रसंग ‘थोडासा अस्थिर करणारा’ असल्याचं सैफने सांगितलं आणि यामुळे भविष्यात कोणत्या प्रकारच्या भूमिका टाळाव्यात याचा धडा मिळाल्याचंही त्याने नमूद केलं.

यापुढे काळजीपूर्वक भूमिका निवडण्याची गरज आहे

सैफने ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात सांगितले की, “एका न्यायालयीन निर्णयानुसार, अभिनेता जे काही स्क्रीनवर बोलतो, त्यासाठी तो जबाबदार असतो. त्यामुळे यापुढे कुठल्याही भूमिका निवडताना काळजी घ्यायला हवी, नाहीतर कलाकार म्हणून समस्या निर्माण होऊ शकतात.”

हेही वाचा…मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

धर्मासारख्या विषयांपासून दूर राहायला हवं

सैफने पुढे सांगितले की, “धर्मासारखे संवेदनशील विषय टाळणे आवश्यक आहे. कलाकारांनी वाद निर्माण करणाऱ्या विषयांपासून दूर राहणे गरजेचे आहे. आपल्याकडे अनेक कथांची समृद्धी आहे, जी आपण सांगू शकतो. आपण इथे वाद निर्माण करण्यासाठी आलेलो नसून एकोपा जपण्यासाठी आलो आहोत.”

हेही वाचा……आणि गोविंदाने ‘ते’ गाणं १५ मिनिटांत शूट करून दाखवलं, आयफेल टॉवर समोर परवानगी नसतानाही केलं चित्रीकरण

“वादग्रस्त कलाकृती पुन्हा करणार नाही”

सैफ अली खानला ‘तांडव’ वेबसीरिजसाठीदेखील प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी शोच्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे निर्मात्यांना माफी मागावी लागली होती. या वादावर सैफने म्हटले, “या अनुभवातून शिकायला मिळाले आहे की, पुन्हा असं काम करणे योग्य नाही. जर कोणी मला विचारले की, ‘तुम्ही पुन्हा असं काम कराल का?’ तर मी म्हणेन, ‘नाही, कारण यामुळे फक्त समस्या निर्माण होतात.’ मला अनेक ऑफर्स येतात, त्यामुळे वादग्रस्त विषयांपासून दूर राहणे अधिक चांगले आहे. आपलं काम जात-पात, धर्म विसरून देशाला एकत्र आणणे आहे.”