Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता जोधपूरमधील बिश्नोई समाजाने देखील भाईजानचे वडील सलीम खान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. शनिवारी जोधपूरमध्ये रस्त्यावर उतरून बिश्नोई समाजाकडून आंदोलन करत अभिनेता व त्याच्या वडिलांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. या आंदोलनाची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

‘IANS’ने दिलेल्या वृत्तानुसार जोधपूरच्या विविध भागांमध्ये शनिवारी बिश्नोई समाजाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बिश्नोई समुदायाच्या सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित करत अभिनेत्याने ( Salman Khan ) समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा

“आम्ही बिश्नोई आहोत आणि आम्ही कोणाचीही अशीच बदनामी करत नाही. जेव्हा २६ वर्षांपूर्वी या शिकारप्रकरणी गुन्हा दाखल झाला तेव्हा, बिश्नोई समाजाच्या तत्कालीन आमदारांसह अनेक मान्यवर घटनास्थळी व हा खटला सुरू झाला तेव्हा उपस्थित होते. त्यामुळे आता सलीम खान खोटी विधाने करून लोकांची दिशाभूल करू शकत नाहीत. संपूर्ण बिश्नोई समाज त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे बिश्नोई समाज दुखावला गेला आहे. काळवीट प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू. त्याच्या वडिलांनी दावा केल्याप्रमाणे सलमान खरंच निर्दोष होता, तर त्याला देशभरातल्या नावाजलेल्या वकिलांची गरज का पडली?” असा सवाल बिश्नोई समाजाने यावेळी उपस्थित केला आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा याच समुदायाचा एक भाग आहे. तो, ‘बिश्नोई परंपरेचे सगळे २९ नियम पाळतो’ असं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. तसेच “सलमान खानने जर माफी मागितली नाही, तर सनातन हिंदू समाज त्याच्याविरोधात आंदोलन करेल” असा इशाराही त्यांनी भाईजानला दिला आहे.

हेही वाचा : पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता

Salman Khan
सलमान खान व त्याचे वडील सलीम खान ( Salman Khan )

सलमान खानचे वडील नेमकं काय म्हणाले होते?

सलीम खान यांनी अलीकडेच काळवीट प्रकरणावर भाष्य केलं होतं. काळवीट शिकार प्रकरणात सलमानचा कोणताही सहभाग नाही आणि बिश्नोई समुदाय पैसा आणि प्रसिद्धीसाठी त्याला लक्ष्य करत आहे. असा दावा त्यांनी यावेळी केला होता. सलमानने ( Salman Khan ) आजवर झुरळाला सुद्धा दुखापत केली नाहीये… काळवीट तर सोडाच. कारण, तो ‘प्राणीप्रेमी’ आहे. असं सलमान खानच्या वडिलांनी मुलाखतीत सांगितलं होतं. दरम्यान, सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर आता त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.