Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत खूपच दक्षता बाळगू लागले आहेत. १२ ऑक्टोबरला वांद्रे पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील काही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास देखील चालू आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या हत्येनंतर सलमान खानचे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. याशिवाय अभिनेत्याला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाईजानचा भाऊ अरबाज खानने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत भावाच्या सुरक्षेबद्दल भाष्य केलं आहे.

अरबाज खान म्हणाला, “आम्ही सगळे ठीक आहोत. पण, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे साहजिकच सगळेजण प्रचंड चिंतेत आणि त्याची ( सलमान ) काळजी करत आहोत.”

सलमानच्या ( Salman Khan ) सुरक्षेविषयी संपूर्ण कुटुंबीय कसे काळजी करतात याबद्दल अरबाज म्हणतो, “सध्या एक कुटुंबीय म्हणून सलमानसाठी आम्हाला जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल याचा विचार आम्ही करत असतो. सरकार, पोलीस यांच्या मार्गदर्शनानुसार सलमानची सुरक्षा कशी जपता येईल याचा प्रयत्न आम्ही करतोय. सध्या प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे.”

हेही वाचा : Bigg Boss 18: बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या आदराने…”

सलमान खानची सुरक्षा वाढवली

बाबा सिद्दीकी सलमान खानच्या ( Salman Khan ) खूपच जवळचे होते. त्यांच्या हत्येनंतर भाईजानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आणि पनवेलच्या फार्म हाऊसवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पुढील काही दिवस सलमानने घराबाहेर पडू नयेत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी आधी दिलेला नकार, मग घडलं असं काही…; प्राजक्ता माळीने स्वत: केला खुलासा, कसा बदलला निर्णय?

Bigg Boss च्या वीकेंडच्या वारला ब्रेक?

गेल्या शनिवारी बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानने ( Salman Khan ) ‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’चं शूटिंग त्वरीत थांबवून लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली होती. आता येत्या काळात सुद्दा सलमान शोमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याच्याऐवजी करण जोहर किंवा फराह खान हे दोघं येत्या वीकेंडला होस्ट म्हणून येण्याची शक्यता आहे.