Bajrangi Bhaijaan completes 9 years: बोलता न येणारी, मुकी असणारी मुन्नी तुम्हाला आठवते? ती पाकिस्तानची आहे, हे समजल्यावर तिला सरहद्दीपार सोडण्यासाठी जीवाचं रान करणारा हनुमानभक्त पवन आठवतो? तिला सोडून परतताना पवनला ‘मामा’ अशी मुन्नीने मारलेली हाक आठवते? ९ वर्षापूर्वी कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १७ जुलै २०१५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी शूटिंगदरम्यानचे कलाकारांचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

Bajrangi Bhaijaan बद्दल नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगच्यावेळचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये सलमान आणि करिना एकमेकांना चिडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच, या व्हिडिओमध्ये मुन्नीची भूमिका साकारलेली हर्षाली मल्होत्रादेखील दिसत आहे. यापैकी एक व्हिडिओ ‘आज की पार्टी’, ‘सेल्फी ले ले रे’ या गाण्यादरम्यानचे आहेत. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी कंमेट करत या चित्रपटाविषयीचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हटले आहे. तर एका युजरने ‘आजपर्यंत असा चित्रपट बनला नाही, हे मी लिहून देतो’, असे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणतो, या चित्रपटाला ऑस्कर मिळाला पाहिजे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हा फक्त चित्रपट नाही तर भावना आहेत.

‘बजरंगी भाईजान’ला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल येणार का? हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. २०२१ मध्ये सलमान खानने या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. या चित्रपटाच्या पुढच्या भागाची कथा विजयंद्र प्रसाद हे लिहित असल्याचे सलमानने म्हटले होते. तर याबाबत कबीर खान यांनी या चित्रपटाबाबत अनेक कल्पना आहेत, ज्या ‘बजरंगी भाईजानच्या’ कथानकाला पुढे घेऊन जातील, असे म्हटले होते.

हेही वाचा: Bigg Boss OTT3 : वाइल्ड कार्ड स्पर्धकाने घरात एंट्री घेताच मोडला ‘हा’ महत्त्वाचा नियम; बिग बॉसने पहिल्याच दिवशी…

दरम्यान, ७५ कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतासहित संपूर्ण जगभरात ९६९ कोटींची कमाई करत धुमाकूळ घातला होता. तर हर्षाली मल्होत्राने एकही संवाद न बोलता प्रेक्षकांचे मन जिंकले होते. सलमान खान, हर्षाली मल्होत्रा यांच्याशिवाय करीना कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.