सुनील दत्त हे १९६० आणि १९७० च्या दशकाच्या चित्रपटांमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. १९८० पर्यंत त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, १९८४ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. बऱ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला, अभिनेत्री नर्गिसशी केलेलं लग्न, मुलगा संजय दत्तवर लागलेले गंभीर आरोप यामुळे सुनील दत्त नंतर पार खचून गेले.

आज सुनील दत्त यांचा जन्मदिन. मध्यंतरी त्यांच्याविषयी ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणताना संजय दत्तने त्यांचा उल्लेख राजकारणातील ‘भोळी’ व्यक्ती असा केला होता. संजय दत्तला नेमकं वडिलांबद्दल काय वाटायचं तेच आपण जाणून घेणार आहोत. “ते फार चांगले होते आणि त्यांना लोकांसाठी बरंच कार्य करायचं होतं, पण लोक सतत बाबांना मूर्ख बनवत असत.” असंही संजय दत्तने म्हटलं होतं.

आणखी वाचा : ‘पद्मावत’मधील भूमिकेबाबत शाहिद कपूर असंतुष्ट; म्हणाला, “मला स्वतःला ते काम…”

१९९० मध्ये फिल्मफेअरच्या मुलाखतीमध्ये संजय दत्त म्हणाला होता, “मला वाटतं त्यांनी राजकारणातून बाहेर पडावं. राजकारणात एवढ्या इमानदार आणि चांगल्या व्यक्तीसाठी स्थान नाही. त्यांना देशासाठी काही तरी चांगलं कार्य करायचं होतं, पण हे काम एकट्यादुकट्याचं नाही याची त्यांना जाणीव नव्हती. राजकारणात प्रवेश केल्यापासूनच ते प्रचंड अस्वस्थ होते, माझ्या मते त्यांनी चित्रपट क्षेत्रातच काम करायला हवं होतं.”

संजय दत्तला ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सुनील दत्त यांनी खूप मदत केली, शिवाय संजय दत्तला जेव्हा ‘टाडा’अंतर्गत अटक करण्यात आली तेव्हासुद्धा सुनील दत्त यांनी बऱ्याच नेत्यांचे उंबरे झिजवले. २००७ साली १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्तवरचे सगळे आरोप खोटे ठरले, पण अवैध शस्त्रे घरात बाळगल्याने त्याला शिक्षा भोगावी लागली. २००५ साली वयाच्या ७५ व्या वर्षी सुनील दत्त यांचे निधन झालं. मुलगा संजय दत्तसह ते शेवटचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात दिसले होते.

Story img Loader