अभिनेता संजय नार्वेकर यांनी हिंदी सिनेमात आपल्या प्रवासाची सुरुवात ‘वास्तव: द रिअ‍ॅलिटी’ या चित्रपटातून केली होती. नुकतेच या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत असताना संजय नार्वेकर यांनी त्यांच्या सहकलाकार संजय दत्तबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

संजय नार्वेकर सांगतात की, ‘वास्तव’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्या दिवसापासूनच संजय दत्तच्या मृदू स्वभावामुळे त्यांची भीती कमी झाली. संजय नार्वेकर म्हणतात, “मला आठवतंय, जेव्हा वास्तवच्या सेटवर माझा पहिला दिवस होता, तेव्हा मी खूप नर्व्हस होतो; कारण समोर संजय दत्त हा सुपरस्टार होता.”

हेही वाचा…ना सलमान, ना शाहरुख…; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता आहे रणवीर सिंहचा

आणि संजू बाबाने म्हटलं…

संजय नार्वेकर पुढे सांगतात, “जेव्हा माझा पहिला डायलॉग झाला, तेव्हा बाबाने (संजय दत्त) शॉट सुरू होण्याआधी मला जवळ बोलावलं आणि म्हणाला, ‘तूही संजय आणि मीही संजय, घाबरायचं नाही. आपण सगळं बरोबर करून दाखवू!’ या शब्दांनी माझी सगळी भीती दूर झाली.”

संजय नार्वेकर पुढे सांगतात, “बाबाने असे म्हटल्यावर माझ्या मनात विचार आला की, एक सुपरस्टार इतक्या साधेपणाने, जणू माझा मित्र आहे अशा भाषेत बोलतोय; त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतर माझी सगळी भीती निघून गेली. तो पहिला प्रसंग अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यावेळी जर कोणी तिरकसपणे बोललं असतं, तर कदाचित माझा आत्मविश्वास ढासळला असता, त्यामुळे बाबाच्या त्या स्वभावासाठी त्याला १०० पैकी १०० गुण आहेत.”

हेही वाचा… ‘सिंघम अगेन’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का? ५ मिनिटांचा ट्रेलर कापण्यासाठी रोहित शेट्टीने घेतले तब्बल ‘एवढे’ दिवस

संजय दत्तने कोरिओग्राफरला कसं वाचवलं?

‘वास्तव’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, “दहीहंडी सीनच्या शूटिंगवेळी आमचे डान्स मास्टर आम्हाला दाखवत होते की, वर कसं जायचं आणि कुठं उभं राहायचं. ते आम्हाला दिशा देत असताना अचानक त्यांचा तोल गेला. मात्र, बाबाने (संजय दत्त) लगेच धावत जाऊन त्यांना वाचवलं. तिथे कोणी दुसरं असतं, तर कदाचित मागे हटलं असतं, पण संजू बाबाने तसं केलं नाही.”

हेही वाचा… Video : “आमची बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण”, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहचं लेकीबद्दल वक्तव्य

संजय नार्वेकर आजही आपल्या सहकलाकार संजय दत्तबद्दल आदर व्यक्त करताना सांगतात की, ‘वास्तव’नेच त्यांना अभिनयाच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची प्रेरणा दिली. “महेशजी (मांजरेकर, दिग्दर्शक) आणि संजय सर यांनी मला खूप मदत केली. मला काहीच कळत नव्हतं, पण संजू बाबा मला सगळं शिकवत असे,” असं म्हणत नार्वेकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.