Sanya Sagar Post : बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar Wedding) शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी व्हॅलेंटाइन डेला लग्न केलं. प्रतीकने मुंबईतील घरी प्रियाशी लग्नगाठ बांधली. दोघांच्याही लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. प्रतीकने लग्नात बब्बर कुटुंबाला बोलावलं नाही, त्यामुळेही बरीच चर्चा होत आहे. अशातच त्याच्या पहिल्या बायकोच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. प्रतीक बब्बरचे पहिले लग्न सान्या सागरशी झाले होते. सान्या व प्रतीक यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ते चार वर्षांनी २०२३ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. दोघेही प्रेमात पडले आणि सोबत राहू लागले. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला प्रेमाची कबुली देणाऱ्या प्रतीक व प्रिया यांनी प्रेमाचाच दिवस लग्नासाठी निवडला आणि साता जन्माचे सोबती झाले.
प्रतीकच्या लग्नानंतर त्याची पहिली बायको सान्या सागरने केलेली पोस्ट चर्चेत आहे. सान्या सागरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट एकटेपणाबद्दल आहे. “काही काळासाठी एकटं राहणं हे धोकादायक आहे. कारण त्याची सवय होते. त्यात किती शांतता आहे, हे तुम्हाला एकदा कळालं की मग तुम्हाला लोकांशी डील करावं वाटत नाही,” असं सान्याच्या या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.
सान्या सागरची पोस्ट
दरम्यान, प्रतीक बब्बर व सान्या लग्नाआधी ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २ वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप समस्या आल्या. दोघांनी नात्यातील अडचणी सोडवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर दोघांनी घटस्फोट घेतला. चार वर्षांत ते वेगळे झाले. ३४ वर्षांची सान्या सागर ही घटस्फोटानंतर मुंबई सोडून गोव्यात स्थायिक झाली आहे. सान्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘पार्टी टिल आय डाय’ या सीरिजमध्ये झळकली होती. सान्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
© IE Online Media Services (P) Ltd