बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी मुलाखतींदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता दिग्गज अभिनेत्री शबाना आजमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चांचा भाग बनल्या आहेत. अरबाज खानच्या ‘द इनव्हिन्सिबल्स’ कार्यक्रमात आपल्या खासगी आयुष्याबद्दल त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.

जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांची प्रेमकहाणी आजही चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असल्याचे पाहायला मिळते. कारण- जेव्हा या जोडीने लग्न केले त्यावेळी जावेद अख्तर यांचे लग्न झाले होते आणि त्यांना त्या लग्नापासून झोया व फरहान, अशी दोन मुले आहेत. शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांनी ९ डिसेंबर १९८४ ला लग्नगाठ बांधली. आता शबाना आजमी या जावेद अख्तर यांच्या प्रेमात कशा पडल्या आणि त्याआधी जावेद अख्तरबद्दल त्या काय विचार करायच्या याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.

जावेद अख्तर यांच्याबद्दल बोलताना शबाना आजमी म्हणतात, “आमच्या दोघांच्या घरची पार्श्वभूमीदेखील सारखीच आहे. आमच्या दोघांचे वडील समाजवादी आणि गीतरचनाकार आहेत. सुरुवातीच्या काळात मी जावेदला टाळायचे. जावेदने कविता लिहायला सुरुवात केली होती आणि त्या कविता माझ्या वडिलांना दाखविण्यासाठी, त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी तो माझ्या घरी यायचा. माझे वडील कैफी आजमी हे प्रसिद्ध उर्दू कवी होते, त्यांना भेटण्यासाठी जावेद घरी यायचा. पण, मी जावेद आणि सलीम अली यांच्या रागाबद्दल ऐकून होते. त्यामुळे या दोघांपासून मी दूरच राहायचे. सुरुवातीला मी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. १९८० ला माझा ‘स्पर्श’ हा चित्रपट आला होता. त्यावेळी त्यानं खूप कौतुक केलं होतं. तो घरी आला आणि चित्रपटातल्या सर्व कलाकारांनी बोलावलं. त्याला चित्रपटातील प्रत्येक संवाद माहीत होता आणि प्रत्येक डायलॉग पाठदेखील होता. इतकंच नाही, तर छोटे छोटे हावभाव माहीत होते. त्यावेळी मला जाणवलं की, त्याच्याकडे चांगली समज आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्याच्याबरोबर बसले तेव्हा तेव्हा मला समजत गेलं की, तो माझ्या वडिलांसारखाच आहे. हळूहळू मला याची जाणीव होत गेली की, तो माझ्यासाठी उत्तम जोडीदार आहे, योग्य व्यक्ती आहे आणि त्यानंतर आमच्या नात्याला सुरुवात झाली.

हेही वाचा: “पोटात बुक्का हानला तवा…”, हेमंत ढोमेची पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट! हटके कॅप्शनने वेधलं लक्ष

त्याबरोबरच शबाना आजमी यांनी जावेद अख्तर यांच्या दारूच्या व्यसनाबद्दलही व्यक्तव्य केले आहे. तो काळ कठीण होता, असं म्हणताना त्यावेळी जावेद एका दिवसात दारूची पूर्ण बाटली संपवायचा. पण ज्यावेळी त्याला समजलं की, याच पद्धतीनं तो दारू पीत राहिला, तर तो फार काळ जिवंत राहू शकणार नाही. एक दिवस मला त्यानं सांगितलं की, यापुढे मी दारूला हात लावणार नाही आणि खरंच त्यानं त्यानंतर कधीही दारूला हात लावला नाही. त्याची इच्छाशक्ती अविश्वसनीय आहे, असे शबाना यांनी म्हटले आहे.