भारतीय संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरत जवळपास १३ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी भारतात आणली. बार्बोडोसमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव केला. या विजनानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

विश्वचषक जिंकल्यावर गुरुवारी टीम इंडिया मायदेशी परतली. देशात आल्यावर सर्वप्रथम सगळ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत हे सगळे खेळाडू मरिन ड्राइव्ह परिसरात दाखल झाले. याचठिकाणी ओपन बसमधून भारतीय संघाच्या विजयी परेडला सुरुवात झाली. सगळ्या खेळाडूंचं चाहत्यांनी मोठ्या दणक्यात स्वागत केलं. याचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय मरीन ड्राइव्हवरची अभूतपूर्व गर्दी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या या विजयोत्सवावर सध्या सर्व स्तरांतून प्रतिक्रिया आहेत.

हेही वाचा : शेतावर गेल्यानंतर मनाचा बकालपणा दूर होतो – नाना पाटेकर; ‘सागरिका म्युझिक’ कंपनीला २५ वर्षे पूर्ण, नाना पाटेकर यांचे कवी आणि गीतकार म्हणून पदार्पण

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने देखील एक्स पोस्ट शेअर करत या सगळ्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. “या मुलांना ( टीम इंडियाचे खेळाडू ) इतकं आनंदी आणि भावुक झालेलं पाहून माझं मन अभिमानाने भरून आलं आहे. सगळ्या भारतीयांसाठी हा एक अद्भुत क्षण आहे. आमची मुलं आम्हाला एवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन जातात हे पाहून खरंच अभिमान वाटतो. माझ्या टीम इंडियावर प्रेम करत राहा आणि आता रात्रभर नाचत राहा. बॉईज इन ब्लूमुळे सगळ्यांचं दु:ख दूर झालं आहे. बीसीसीआयने यासाठी भरपूर मेहनत घेतली. BCCI, जय शाह आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचं खूप खूप अभिनंदन!” अशी एक्स पोस्ट शाहरुख खानने शेअर केली आहे.

हेही वाचा : Digital Adda : ६ अभिनेत्रींसह रंगणार स्वप्नील जोशीची जुगलबंदी! परदेशात ‘असं’ पार पडलं ‘बाई गं’ चित्रपटाचं शूटिंग

भारतीय संघ १३ वर्षांनंतर विश्वविजेता ठरला

भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०११ मध्ये, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतरही मुंबईत रात्रभर जल्लोष करण्यात आला होता. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण रस्त्यावर सेलिब्रेशन करण्यासाठी आले होते. यामध्ये शाहरुख खानचाही समावेश होता. तसेच याआधी २००७ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. यावेळी शाहरुख खानही पाकिस्तान विरुद्धचा अंतिम सामना पाहण्यासाठी जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पोहोचला होता.