बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी अभिनेत्री अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप साखरपुडा उरकला. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम देत तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केल्याचं अदितीने जाहीर केलं.

सिद्धार्थ-अदितीचा गुपचूप साखरपुडा पार पडल्यावर आता हे जोडपं लग्न केव्हा करणार याची चाहते प्रतीक्षा करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘गलाट्टा गोल्डन स्टार्स’ सोहळ्यात सिद्धार्थने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. लग्न केव्हा करणार या प्रश्नावर मौन सोडत अभिनेता म्हणाला, “अनेक लोकांचा असा समज झालाय की, आम्ही गुपचूप साखरपुडा केला. पण, फक्त कुटुंबाबरोबर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि गुपचूप एखादा कार्यक्रम करणं यात खूप मोठा फरक आहे. ज्या लोकांना आम्ही साखरपुड्याला बोलावलं नाही त्यांना असं वाटतं की, यामागे नक्की काहीतरी गुपित आहे. परंतु, जे लोक तिथे उपस्थित होते त्यांना माहितीये की, हा कार्यक्रम खूप प्रायव्हेट होता. आमचे जवळचे कुटुंबीय आणि काही नातेवाईक त्यावेळी उपस्थित होते.”

हेही वाचा : “त्या दिवसापासून पुन्हा शिवी दिली नाही”, ‘लालबाग परळ’, ‘दुनियादारी’ चित्रपटांबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, “माझ्या आईने…”

सिद्धार्थ लग्नाबद्दल म्हणाला, “अदितीने मला होकार देण्यासाठी किती वेळ घेतला वगैरे हे प्रश्न आता दूर राहिले. मी खूप दिवस विचार करत होतो की, ही मला होकार कळवेल का? की नाही सांगेल. पण, सुदैवाने ती हो म्हणाली. आता आम्ही लग्न केव्हा करणार याचा निर्णय कुटुंबातील वरिष्ठ लोक घेतील. त्यांचा निर्णय आम्हा दोघांसाठी महत्त्वाचा असेल. ही काही चित्रपटाच्या शूटिंगची तारीख नाही की, मी ठरवेन तसं होईल. मोठ्या लोकांमध्ये चर्चा झाल्यावर तेच निर्णय घेतील.”

हेही वाचा : Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…

‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिती व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले. आता लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, सिद्धार्थ लवकरच ‘इंडियन २’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये कमल हासन, रकुल प्रीत आणि काजल अग्रवाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader