बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी असतात, ज्यांची मोठी चर्चा होताना दिसते. अनेकदा हे कलाकार याविषयी उघडपणे बोलतात; तर काही जण याबाबत गुपित ठेवतात आणि उघडपणे बोलत नाहीत. मात्र, या जोड्या लोकप्रिय असतात. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या नात्याबद्दल माहीत असते. काही रिलेशनशिप टिकतात; तर काही काळाच्या ओघात तुटतात. पण, काही लव्ह स्टोरी कायम चर्चेत राहतात. अभिताम बच्चन व रेखा यांच्याबद्दलही आजही बोलले जाते. अशीच आणखी एक जोडी लोकप्रिय होती आणि ती म्हणजे श्रीदेवी(Sridevi) व मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) या लोकप्रिय कलाकारांची.

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार म्हणून या दोघांनाही ओळखले जाते. दोघांच्याही नात्याविषयी अनेकदा चर्चा होत असत. मात्र, त्यांनी त्यावर कधीही उघडपणे वक्तव्य केले नाही. त्या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचेही अनेकदा म्हटले गेले. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांचे आधीच अभिनेत्री योगिता बाली यांच्याबरोबर लग्न झाले होते. असे म्हटले जाते की, मिथुन यांना योगिताबरोबर घटस्फोट घ्यायचा नव्हता, त्यांच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते. म्हणून श्रीदेवी व मिथुन चक्रवर्ती एकमेकांपासून वेगळे झाले. आता दिग्दर्शक करण राजदान यांनी एका मुलाखतीत श्रीदेवी व मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी वक्तव्य केले आहे.

करण राजदान काय म्हणाले?

करण राजदान यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत करण राजदान यांनी सांगितले की, मिथुन चक्रवर्ती व श्रीदेवी एकमेकांबरोबर खूप भांडायचे. तसेच मिथुन चक्रवर्ती खूप भावनिक व्यक्ती असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “ते रात्रभर खूप भांडायचे. आता ती या जगात नाही. त्यामुळे मी तिच्याविषयी जास्त बोलू शकत नाही”, असेही त्यांनी म्हटले. पुढे मिथुन चक्रवर्ती यांच्याबाबत बोलताना करण राजदान म्हणाले, “मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे ज्या प्रकारची ऊर्जा होती, तशी कोणाकडेच नाही. ते रात्रभर जागे राहून त्यांच्या डान्सचा सराव करायचे. जरी ते पूर्ण रात्र भांडले तरी ते दुसऱ्या दिवशी वेळेत सेटवर हजर असायचे. ते खूप भावनिक आणि निर्मळ हृदयाचे आहेत.”

मिथून चक्रवर्ती यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर श्रीदेवी यांनी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर लग्न केले. जान्हवी व खुशी अशा त्यांना दोन मुली आहेत. २०१७ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. जान्हवीने बॉलीवूडमध्ये विविध चित्रपटांतून भूमिका साकारीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. खुशीने नुकतेच पदार्पण केले आहे. आता पुढे जान्हवी कोणत्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.