गोविंदा(Govinda) यांनी ९० च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. डेव्हिड धवन(David Dhawan) व गोविंदा यांची दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी गाजली होती. या दोघांनी एकत्र येत ‘हीरो नंबर १, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’, ‘बडे मियाँ छोटे मिया’, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम करीत लोकांचे मोठे मनोरंजन केले आहे. १८ चित्रपटांत एकत्र काम केल्यानंतर या जोडीत फूट पडली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदा व डेव्हिड धवन यांच्यात फूट का पडली यावर गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हिड धवन हे माझ्या वडिलांसारखे …

सुनीता आहुजा यांनी नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत डेव्हिड धवन व गोविंदाच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण सांगत सुनीता आहुजा यांनी म्हटले, “डेव्हिड धवन हे माझ्या वडिलांसारखे आहेत, असे मी कायमच म्हणत आली आहे. पूर्वी कलाकारांचे चमचे असत आणि ते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करीत. गोविंदा व डेव्हिड धवन यांच्यातील मैत्री पाहून लोकांना ईर्षा वाटायची. जेव्हा तुम्ही नकारात्मक लोकांनी वेढलेले असता, त्यावेळी त्यांच्यातली नकारात्मकता तुमच्यात येते.”

पुढे सुनीता यांनी डेव्हिड धवनची बाजू मांडत म्हटले की, डेव्हिड गोविंदाला कधी वाईट बोलला नाही. त्याने गोविंदाला फक्त वेळेनुसार स्वत:मध्ये बदल करण्याचा सल्ला दिला. सुनीता यांनी म्हटले, “डेव्हिड गोविंदाला कधीही वाईट काहीही बोलला नाही. त्याने म्हटले की, ९० च्या दशकात एकटा नायक असलेला चित्रपट चालत असे; पण आता तसे होत नाही. असे अपवादा‍त्मक चित्रपट आहेत, जे लोकप्रिय ठरतात. डेव्हिडने सहकलाकाराची भूमिका असलेल्या भूमिका करण्याचा सल्ला दिला होता. शेवटी, त्याने बडे मियां, छोटे मियाँ या चित्रपटामध्ये दुय्यम भूमिका साकारली आणि ती निवड वाईट नव्हती. पण, गोविंदाच्या आजूबाजूचे लोक त्याला चिडवायचे, ‘तू हीरो आहेस’, असे म्हणायचे. गोविंदाच्या आजूबाजूला असणारे लोक चांगले नव्हते. या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे घडल्या, ते पाहून मला राग येतो.

नुकतेच गोविंदाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये तो बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना सुनीताने म्हटले, “त्याने तीन चित्रपटांत काम करण्याची घोषणा केली आहे; पण तो या चित्रपटांबद्दल अधिक सांगत नाही, तोपर्यंत मी त्यावर माझं मत सांगणे टाळते. चांगले किंवा वाईट जे काही असेल, ते मी तोंडावर सांगते. तो माझा नवरा आहे किंवा गोविंदा आहे म्हणून मी चमचागिरी करणार नाही. मी फक्त कौतुक करीत नाही, मी योग्य ते सांगते.”

गोविंदा व सुनीता अहुजा यांचा मुलगा यश हा २०२५ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तोसुद्धा करिअरच्या बाबतीत गोविंदाचा सल्ला ऐकत नाही, असा खुलासा त्यांनी केला. सुनीता यांनी याबाबत बोलताना म्हटले, “गोविंदा ९० च्या दशकात अडकल्यामुळे त्याचा सल्ला कोणीही ऐकत नाही. मी आताच्या काळात उपयोगी पडेल, असा सल्ला त्याला देते. ९० च्या दशकातून पुढे जा, असे आम्ही गोविंदाला सांगत असतो”, असे म्हणत गोविंदा आजही ९० च्या दशकात अडकल्याचे सुनीता यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती

दरम्यान, आता गोविंदा कोणत्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita ahuja reveals reason of rift between govinda and david dhawan also shares actors kids ignore his advice nsp