Rajiv Menon on Bombay Movie: अरविंद स्वामी व मनीषा कोईराला यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बॉम्बे’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर राजीव मेनन यांनी या चित्रपटाचे शूटिंग केले होते.
“तुम्ही ‘बॉम्बे’सारखा चित्रपट आता बनवू…”
आता नुकतीच राजीव मेनन यांनी o२ इंडिया या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजीव मेनन म्हणाले, “बॉम्बे सारखा चित्रपट आज बनवला जाऊ शकत नाही. भारतातील परिस्थिती अस्थिर आहे. लोक विरोध करतात. धर्म हा मोठा मुद्दा बनला आहे. मला वाटत नाही की तुम्ही ‘बॉम्बे’सारखा चित्रपट आता बनवू शकता. तो थिएटरमध्ये प्रदर्शित करू शकता. असे चित्रपट आता प्रदर्शित केले तर लोक थिएटर जाळून टाकतील. गेल्या २५-३० वर्षांत भारतातील सहिष्णुता कमी झाली आहे. “
दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चित्रपटात हिंसाचाराच्या सीनसाठी ए आर रहमान यांनी रचलेल्या संगीताचा वापर केला. यावर बोलताना राजीव मेनन म्हणाले, “चित्रपटात जी हिंसाचाराची दृश्ये होती, त्यासाठी ए आर रेहमानचे संगीत आहे. ते सीन वेदनादायक होते, त्याप्रमाणेच संगीतही वेदनादायक होते. त्यामध्ये ढोल वाजल्याचा किंवा व्हायोलिनचा आवाज येत नाही. हिंसाचारातील वेदना त्या संगीतातून जाणवते.”
राजीव मेनन म्हणाले, “शहर जळत होतं, इतर कोणी त्या सीनच्या पार्श्वभूमीसाठी वेगळं संगीत निवडलं असतं, पण मणिरत्नम यांनी एक आई तिच्या मुलाला शोधत आहे, या भावनेचा विचार करून संगीत निवडले. ते अंगाई गीत होते”, असे म्हणत ‘बॉम्बे’ चित्रपटाविषयी राजीव मेनन यांनी वक्तव्य केले आहे.
राजीव मेनन यांनी ‘बॉम्बे’ या चित्रपटात मणिरत्नम यांच्याबरोबर काम केल्यानंतर ‘गुरू’ व ‘कडाल’ या चित्रपटातही त्यांच्याबरोबर काम केले. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. मणिरत्नम त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचा २०२२ मध्ये आलेला ‘पोन्नियिन सेल्वन’ आणि २०२३ मध्ये प्रदर्शित ‘पोन्नियिन सेल्वन २’ हे चित्रपट चांगलेच गाजले. त्रिशा कृष्णनसह अभिनेत्री ऐश्वर्या रायदेखील प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता लवकरच मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाईफ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.