बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांनी विकीच्या कामाचं कौतुक करायला सुरुवात केली. आता प्रेक्षक त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विकी कौशल सध्या वेगवेगळ्या मीडिया हाऊसला मुलाखती देताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच विकी कौशलने प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली अन् वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. या मुलाखतीदरम्यान ‘सरदार उधम’ या चित्रपटाचा उल्लेख झाला. ‘जालियनवाला बाग’ हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायरला यमसदनी धाडणाऱ्या सरदार उधम यांच्यावर हा चित्रपट बेतलेला होता. या चित्रपटातील विकीच्या कामाची खूप प्रशंसा झाली. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली अन् हा त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण असा रोल ठरला.

आणखी वाचा : Kriti Sanon Deepfake Video: बॉलिवूड अभिनेत्रींभोवती डीपफेक व्हिडीओचा विळखा; क्रीती सेनॉनचाही व्हिडीओ व्हायरल

‘सरदार उधम’मधील क्लायमॅक्सच्या अलीकडे येणाऱ्या एका सीनमध्ये १८-१९ वर्षांचा लहानसा उधम सिंह जालियनवाला बागेतील मृतदेहांच्या गर्दीत जीवंत असलेल्या लोकांना वाचवताना आपल्याला पाहायला मिळतो. तो संपूर्ण सीनच अंगावर काटा आणणाराच आहे. या सीनबद्दल अन् तो चित्रित करताना आलेल्या अनुभवाबद्दल विकीने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. एक दोन नव्हे तर तब्बल २० दिवस या सीनचं चित्रीकरण सुरू होतं.

विकी म्हणाल, “हा सीन म्हणजे मी आजवर परफॉर्म केलेला सर्वात कठीण सीन. मी काही गोष्टींसाठी मानसिक तयारी केली नव्हती. सलग २० दिवस फक्त त्याच सीनवर काम सुरू होतं. एक गोष्ट शुजित यांनी मला सांगून ठेवलेली होती, की त्या सीनमध्ये खोटे (डमी) मृतदेह नसतील, ती सगळी खरी माणसंच असतील आणि मी तुला त्या सीनमध्ये सोडून देईन. तीन कॅमेरा लावले होते, अन् त्यापैकी एक कॅमेरा कुठे होता हे मलादेखील ठाऊक नव्हते.”

पुढे विकी म्हणाला, “मला सांगण्यात आलं होतं की या सीनसाठी कोणताही सराव करायचा नाही, एका १९ वर्षांच्या मुलाची मृतदेह उचलताना होणारी धडपड ही पडद्यावर दिसावी यासाठी मी सराव केला नाही, अन् आम्ही तब्बल २० रात्री त्या सीनवर काम केलं. जी लोक मृतदेह म्हणून त्या मैदानावर पडलेली होती अन् त्यांनाही हे सांगण्यात आलं होतं की मी कोणालाही येऊन उचलून घेऊन जाईन, मलादेखील असंच काहीसं सांगण्यात आलं होतं. जेव्हा मी ते सगळं शूट करून घरी आलो तेव्हा माझी झोप उडाली होती, मला काही दिवस झोप लागत नव्हती. या सीनसाठी फक्त मीच नव्हे तर संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती, अन् तो सीन लोकांना अस्वस्थ करण्यात यशस्वी झाला हेच आमचं यश.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal speaks about the most intense scene from sardar udham avn
Show comments