Waris Pathan met Akshaye Khanna : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे या सिनेमाचीच चर्चा आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना आहे. चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारूनही मुलाखती व प्रमोशनपासून दूर असलेल्या अक्षय खन्नाची एका राजकीय नेत्याने भेट घेतली आहे.
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे. याचदरम्यान एमआयएम नेते व माजी आमदार वारिस पठाण यांनी अक्षय खन्नाची भेट घेतली आहे. वारिस पठाण यांनी अक्षय खन्नाबरोबरच्या भेटीचे फोटो त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले आहे. तसेच अक्षय खन्ना चांगला माणूस आहे, असंही त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर जर एका मुस्लीम अभिनेत्याने औरंगजेबाचे पात्र साकारले असते तर.. असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वारिस पठाण यांची पोस्ट नेमकी काय?
“छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाची आज भेट घेतली, तो चांगला माणूस आहे!!
छावा चित्रपटात ही भूमिका जर मुस्लीम अभिनेत्याने केली असती तर आतापर्यंत काय झालं असतं,” असं वारिस पठाण यांनी अक्षयबरोबरचे फोटो पोस्ट करत लिहिलं आहे.

दरम्यान, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला होता, ते दृश्य ‘छावा’ चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोक भावनिक झाले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं आहे. नागपुरात दंगल झाल्यामुळे तणावाचं वातावरण आहे. महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गटात मोठा वाद झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असतानाच वारिस पठाण यांच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमात औरंगजेबाचे पात्र जर मुस्लीम अभिनेत्याने साकारले असते तर काय आतापर्यंत काय झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.