दिवंगत अभिनेते दिलीप कुमार ‘मुघल-ए-आझम’मधील त्यांची सहकलाकार मधुबालाच्या प्रेमात पडले होते. दोघांच्या अफेअरबद्दल इंडस्ट्रीत बोललं जात होतं. मात्र ही जोडी फार काळ एकत्र राहिली नाही. दोघेही वेगळे झाले आणि त्यानंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं. लग्न केलं तेव्हा दिलीप ४४ वर्षांचे होते, तर सायरा फक्त २२ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर काही काळाने मधुबालाने पहिलं प्रेम असलेल्या दिलीप यांना भेटायचं असल्याचा मेसेज पाठवला. त्याचा सायरा यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, त्यांनी पतीला म्हटलं की त्यांनी मधुबालाला भेटायला हवं.

द सबस्टॅन्स अँड द शॅडो: अॅन ऑटोबायोग्राफी या आपल्या पुस्तकात दिलीप कुमार यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला होता. त्यांनी या पुस्तकात सायरा बानोंचं कौतुक केलंय. सायरा यांना दिलीप यांच्या भूतकाळातील नात्यांची कधीच अडचण नव्हती. त्या वर्तमानकाळात जगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या असल्याचं त्यांचे पती म्हणाले होते. दिलीप ‘राम और श्याम’च्या शूटिंगसाठी मद्रासमध्ये होते, त्यावेळी त्यांना मधुबालाचा मेसेज आला की भेटायचं आहे. “आमच्या लग्नांतर मी मद्रासमध्ये होतो, त्यावेळी मला मधुबालाचा मेसेज आला की तिला मला भेटायचं आहे. मी मुंबईत आल्यावर सायराला मेसेजबद्दल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की मी मधुला भेटायला हवं,” असं दिलीप कुमार म्हणाले.

हेही वाचा – ‘शोले’ हा चार्ली चॅप्लिन, इस्टवूडच्या चित्रपटांची नक्कल; जेव्हा नसीरुद्दीन शाहांनी जावेद अख्तर यांना स्पष्टच सांगितलेलं

मधुबालाच्या घरी गेल्यावर काय घडलं होतं?

दिलीप कुमार यांनी नंतर मधुबालाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. भेटीबद्दल ते म्हणाले, “मी मधुच्या घरी गेल्यावर मला तिला पाहून खूप वाईट वाटलं. ती खूप कमकुवत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील पिवळसरपणातून तिची प्रकृती ठिक नसल्याचं दिसतच होतं पण तिचं हसणंही नैसर्गिक नव्हतं. ती मला पाहून आनंदी झाली आणि म्हणाली, ‘आमच्या राजकुमाराला त्याची राजकुमारी भेटली. मी खूप खूश आहे.'”

हेही वाचा – अमिताभ बच्चन ‘शहेनशहा’ चित्रपटात करणार नव्हते काम; ‘या’ अभिनेत्याला मिळणार होती संधी, त्याने ३-४ सिनेमे साईन केले पण…

मधुबालाने दिलीप कुमार यांना का बोलावलं होतं?

मधुबालाला सल्ला हवा होता, त्यामुळे तिने दिलीप कुमार यांना भेटायला बोलावलं होतं. “ती काही वैयक्तिक गोष्टींमुळे चिंतेत होती, त्यासाठी तिला माझा सल्ला हवा होता. जेव्हापर्यंत ती त्या विषयावर समाधानी झाली नाही, तेव्हापर्यंत आम्ही त्या विषयावर चर्चा केली. त्यानंतर ती शांत झाली. तेव्हाच मी तिला शेवटचं पाहिलं होतं. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी तिचं निधन झालं,” असं दिलीप कुमार यांनी पुस्तकात लिहिलंय.

हेही वाचा – “माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

दिलीप कुमार व मधुबाला यांची प्रेम कहाणी ‘तराना’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघांना लग्न करायचं होतं मात्र मधुबालाच्या वडिलांमुळे काही काळाने ते दोघे वेगळे झाले. तिने १९६० मध्ये किशोर कुमारशी लग्न केलं, मात्र त्यांचं नातं फार चांगलं नव्हतं.