Akshaye Khanna Personal Life : सध्या सगळीकडे ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. ‘छावा’मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. औरंगजेबाची भूमिका बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्नाने केली आहे. या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी अक्षयचं प्रचंड कौतुक होत आहे.
‘रेस’, ‘हलचल’, ‘इत्तेफाक’ आणि ‘दृश्यम 2’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय खन्ना हा बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या अक्षयने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली. पण अक्षय त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलत नाही. ४९ वर्षांचा अक्षय खन्ना अविवाहित आहे. त्याने लग्न का केलं नाही, याचा खुलासा त्याने स्वतःच एकदा केला होता.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अक्षय खन्नाला लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्याने लग्नाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं होतं. “मी स्वतःला लग्न करताना पाहत नाही. मी ‘मॅरेज मटेरियल’ नाही. मी या गोष्टींसाठी बनलेलो नाही. लग्न ही एक कमिटमेंट आहे आणि यामुळे आयुष्यात खूप बदल होतात. लग्नामुळे सगळं काही बदलतं. मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवंय. जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य दुसऱ्या कोणाबरोबर शेअर करता तेव्हा त्यावर तुमचे पूर्ण नियंत्रण असूच शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा कंट्रोल सोडावा लागतो, कारण तुम्ही एकमेकांचे आयुष्य शेअर करता,” असं अक्षय म्हणाला होता.

मुलं दत्तक घेण्याबद्दल अक्षय म्हणाला…
लग्न करणार नसल्याचं अक्षयने म्हटल्यावर त्याला मुलं दत्तक घेण्याबद्दल विचारण्यात आलं होतं; पण त्याने ती शक्यताही नाकारली होती. “मी त्या आयुष्यासाठी तयार नाही. मी माझे आयुष्य शेअर करण्यासाठी तयार नाही. मग ते लग्न असो वा मुलं. मुलामुळेही तुमच्या आयुष्यातही बरेच बदल होतात. तुमच्यासाठी महत्त्वाची प्रत्येक गोष्ट कमी महत्त्वाची होते, कारण मुलाला जास्त महत्त्व मिळतं. हे जीवनात घडणारे बदल आहेत आणि तुम्हाला तुमच्या जीवनात हे बदल करावे लागतात; पण मला ते बदल करायचे नाहीत. मला वाटत नाही की मी भविष्यातही ते करण्यास तयार होईन,” असं अक्षय खन्ना म्हणाला होता.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. तसेच सिनेमाने १३० कोटींचे बजेटही वसूल केले आहे.