सुपरस्टार राजेश खन्ना यांनी एकेकाळी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी यश चोप्रा यांच्याबरोबर ‘इत्तेफाक’ आणि ‘दाग’ असे दोन यशस्वी चित्रपट दिले. परंतु, या दोन चित्रपटांनंतर या दोन दिग्गजांच्या नात्यात खटके उडाले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दोषारोप सुरू झाले. बऱ्याच पुस्तकांत आणि मुलाखतींत अनेकांनी या दोन दिग्गजांनी एकत्र काम करणं का कमी केलं याचे अनेक किस्से सांगितले आहेत. ‘कभी कभी’ व ‘सिलसिला’ या चित्रपटांचे लेखक सागर सरहदी यांनी राजेश खन्ना यांनी यश चोप्रा यांच्याबरोबर काम करणं का कमी केलं याचा किस्सा सांगितला होता.
चित्रपट लेखक सागर सरहदी हे राजेश खन्ना यांना त्यांच्या रंगभूमीच्या दिवसांपासून ओळखत होते. तसेच त्यांनी यश चोप्रा यांच्याबरोबरही ‘कभी कभी’ आणि ‘सिलसिला’ या चित्रपटांत काम केलं होत. सागर सरहदी यांनी यशराज चोप्रा यांना त्यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करणं का कमी केलं, असं विचारलं तेव्हा यश चोप्रा यांनी राजेश खन्ना यांचे सुपरस्टारचे नखरे असल्याचं कारण देत त्यांच्याबरोबर काम करणं कमी केलं, असं सांगितलं होतं.
हेही वाचा……म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा
काय म्हणाले होते राजेश खन्ना?
यासीर उस्मान यांनी राजेश खन्ना यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात असं नमूद केलं आहे की, ‘नमक हराम’नंतर राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे असुरक्षितता वाटू लागली होती. सागर सरहदी म्हणतात, “मी एकदा खंडाळ्याला एका स्क्रिप्टसाठी गेलो होतो. तिथे राजेश खन्ना यांना भेटलो. मी त्यांना विचारलं, “यार, तुम्ही यश चोप्रा यांच्याबरोबर चित्रपट का करीत नाही?” तेव्हा ते चिडून म्हणाले, “यश चांगले दिग्दर्शक नाहीत. ते मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप काम करायला लावतात. मी इतके कष्ट करू शकत नाही.” त्यांच्या उत्तरावर मी हसायलाच लागलो.
राजेश खन्ना आणि यश चोप्रा पुन्हा एकदा १९८८ च्या ‘विजय’ या चित्रपटासाठी एकत्र आले, परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. राजेश खन्ना यांचं १८ जुलै २०१२ ला निधन झालं; तर राजेश खन्ना यांच्या निधनानंतर तीन महिन्यांनी २१ ऑक्टोबर २०१२ रोजी यश चोप्रा यांचं निधन झालं.
© IE Online Media Services (P) Ltd