अभिनेता आमिर खानच्या ‘गजनी’ या सिनेमाने २००८ मध्ये बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. भारतात १०० कोटी क्लबचा जो ट्रेंड सुरू झाला, तो याच सिनेमांनंतर सुरू झाला, असं बोललं जात. या सिनेमांनंतर आलेले सिनेमे १०० कोटींच्या पुढे गेले की, ते यशस्वी झाले असं समजलं जात असे. आमिरचे सिक्स पॅक अ‍ॅप्स, विचित्र हेअर स्टाईल अशा गोष्टींमुळे ‘गजनी’ हा सिनेमा आयकॉनिक सिनेमा झाला. आता या सिनेमाचा सिक्वेलसुद्धा येणार आहे. त्यात आमिर खान हिंदीत, तर अभिनेता सूर्या याच सिनेमाच्या तमीळ व्हर्जनमध्ये दिसणार आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, बॉलीवूडच्या ‘गजनी’ या आयकॉनिक सिनेमात आधी आमिर खान नव्हे, तर सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार होता.

हो तुम्ही बरोबर ऐकलंत. गजनी या सिनेमात बॉलीवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार होता, असं खुद्द या सिनेमात व्हीलनची भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांनी ‘झी ईटीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

हेही वाचा…“गौरी चांगली आई होईल अजिबात वाटलं नव्हतं”, शाहरुख खानचे पत्नीबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘गजनी’च्या मुख्य नायकाची कथा

गजनी हा सिनेमा २००५ मध्ये तमीळमध्ये याच नावाने आलेल्या सिनेमाचा रिमेक होता. तमीळमधील सिनेमात मुख्य व्हीलनची भूमिका अभिनेते प्रदीप रावत यांनी केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांना हा सिनेमा हिंदीतही तयार करावा, अशी इच्छा होती. तेव्हा त्यांनी या सिनेमासाठी कोणी हिंदी नायक विशेषतः सलमान खानशी या सिनेमाच्या बाबतीत प्रदीप यांनी बोलावं, असं सुचवलं होतं. पण, ए. आर. मुरुगादोस यांचं साधं व्यक्तिमत्त्व सलमानला सेटवर भूमिकेचे विविध पैलू साकारण्यासाठी दिग्दर्शक म्हणून आदेश देऊ शकेल का याची प्रदीप यांना खात्री नव्हती. प्रदीप यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, “सलमान हा शीघ्रकोपी (शॉर्ट टेम्पर) असल्याने तो ए. आर. मुरुगादोस यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकेल का या बाबतीत मला खात्री नव्हती. त्यातच मुरुगादोस यांचं व्यक्तिमत्त्व खूपच साधं असल्यानं ते सलमानला कसं समजावून सांगतील हा प्रश्न मला होता.”

कशी झाली सलमानऐवजी आमिरची निवड

सलमान खान या सिनेमासाठी योग्य निवड ठरणार नाही, असं प्रदीप रावत यांना वाटलं होत. त्यांनी मुरुगादोस यांना सलमानऐवजी आमिरच नाव सुचवलं. प्रदीप रावत म्हणाले, “आमिर खान हा शांत स्वभावाचा असून, तो सेटवर सर्वांशी चांगलं वागतो. त्यामुळे मला आमिर या सिनेमासाठी योग्य निवड ठरेल, असं वाटलं. मी आमिरला हा सिनेमा त्यानं एकदा बघावा आणि त्यांनतर हा सिनेमा करायचा किंवा नाही हे त्यानं ठरवावं, असं त्याला सांगितलं. आमिरबरोबर मी ‘सरफरोश’ सिनेमा केल्यानं आमचे चांगले संबंध होते. त्यामुळे मला आमिर मला नाही म्हणू शकला नाही. त्यानं तमीळमधील ‘गजनी’ सिनेमा पाहिला आणि सिनेमा पाहिल्याबरोबर त्यानं हा सिनेमा तो करील, असं सांगितलं.”

हेही वाचा…मद्यधुंद अवस्थेत जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी केलेलं लग्न, ज्येष्ठ अभिनेत्याचा दावा; म्हणाले, “त्या रात्री…”

‘गजनी २’मध्ये दोन नायक दिसणार

‘पिंकविला’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार आमिर खान आणि सूर्या या दोघांनाही ‘गजनी २’ सिनेमा करण्याची इच्छा आहे. मात्र, कुठल्याही एका भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होऊन त्याचा पुन्हा रिमेक व्हावा, अशी दोन्ही अभिनेत्यांची इच्छा नाही. प्रसिद्ध प्रोड्युसर्स अल्लू अरविंद आणि मधु मांटेना यांनी दोन्ही कलाकारांची चिंता लक्षात घेऊन ‘गजनी २’चे शूटिंग एकाच वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चित्रपटांच्या वेळा एकच ठेवण्याचे प्रयोजन आहे. म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील आणि त्यामुळे रिमेकचा शिक्का बसणार नाही आणि प्रेक्षकांसाठी तो एक ताजातवाना अनुभव ठरेल.