अभिनेते राजेश खन्ना आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यातील नातेसंबंध, ‘इत्तेफाक’ आणि ‘दाग’ या दोन यशस्वी चित्रपटांनंतर एका वळणावर येऊन तुटले. दोघांनीही या तुटलेल्या संबंधांसाठी एकमेकांवर दोषारोप केले. यासर उस्मान यांच्या ‘राजेश खन्ना : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार’ पुस्तकातून या नात्याला तडे कसे गेले हे उलगडले आहे.

यासर उस्मान यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की, यश चोप्रा यांनी ‘दीवार’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना हिरो म्हणून कास्ट करण्याचा निर्णय घेतल्यावर तणाव वाढला. राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘दीवार’ हा चित्रपट आधी त्यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, चित्रपटाचे सह-लेखक सलीम खान यांनी यासर उस्मान यांना सांगितले होते की, राजेश खन्ना यांच्याबरोबर कधीच चर्चा झाली नव्हती, कारण ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्यासाठीच लिहिली गेली होती.

हेही वाचा…“तू धर्मांतर केलंस”, ७ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केल्याने आताही ट्रोल होते अभिनेत्री; म्हणाली, “मी हिंदू आहे आणि…”

‘दीवार’ नंतर यश चोप्रा यांनी पुढील चित्रपटाचे, ‘कभी कभी’चे नियोजन सुरू केले. दोन पिढ्यांचा प्रवास मांडणारा हा मल्टीस्टारर चित्रपट होता, ज्यात प्रमुख पात्र एक रोमँटिक कवीचं होत. ही भूमिका राजेश खन्ना यांच्यासाठी अगदी योग्य होती, परंतु त्यांना या भूमिकेसाठी विचारण्यात आले नाही आणि ही भूमिका अमिताभ बच्चन यांना दिली गेली. विशेष म्हणजे, अमिताभ याआधी ‘अ‍ॅंग्री यंग मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांची रोमँटिक भूमिकेसाठी निवड ही अँटी-कास्टिंग होते.

यश चोप्रा यांची अमिताभ बच्चन यांच्याशी ‘चांगली ट्यूनिंग’ असल्याने त्यांनी ‘कभी कभी’ आणि ‘सिलसिला’ या रोमँटिक चित्रपटांसाठी अमिताभ बच्चन यांची निवड केली होती असं सांगितलं होतं. मात्र, या चित्रपटांचे लेखक सागर सरहदी यांनी मात्र याबद्दल एक वेगळाच किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा..मराठमोळी शर्वरी वाघ अन् आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

‘या’ कारणांमुळे यश चोप्रांनी राजेश खन्ना यांना सिनेमात घेणं कमी केलं

लेखक सागर सरहदी यांनी यश चोप्रांना एकदा विचारले होते की, त्यांनी ‘दाग’सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतर पुन्हा राजेश खन्ना यांना त्यांच्या सिनेमात का घेतले नाही. यावर यश चोप्रा म्हणाले, “यार, त्यांच्याबरोबर काम करणे खूप अवघड आहे… ते निर्माता मंडळींना आपल्या घरी बोलावतात आणि उशिरापर्यंत दारू पितात. जोपर्यंत त्यांना झोप येत नाही, तोपर्यंत निर्मात्यांना तिथे राहावे लागते.”

हेही वाचा…“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”

“त्यांना विमानतळावर सोडायला जावं लागतं”

यश चोप्रांनी सागर सरहदी यांना राजेश खन्नांबरोबर काम न करण्याचे आणखी एक कारण सांगितले होते. ते म्हणाले, “जर राजेश मद्रासला शूटिंगसाठी जात असतील, तर निर्मात्यांनी त्यांना विमानतळावर सोडायला जायचे आणि परत आल्यावर त्यांना घ्यायला जायचे, मी हे करू शकत नाही. मी रोजच्या रोज सुपरस्टारच्या या लहरी सहन करू शकत नाही.”

हेही वाचा…पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

या कारणांमुळे यश चोप्रांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करणे कमी केले. यानंतर, १९८८ मध्ये यश चोप्रा आणि राजेश खन्ना पुन्हा ‘विजय’ या चित्रपटासाठी एकत्र आले, परंतु तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.