राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची बिश्नोई गँगने १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येला आता दोन आठवडे उलटले आहेत. सिद्दिकी यांचे कुटुंबीय या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाही. काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान खानवर लॉरेन्स बिश्नोईचा राग आहे. त्यामुळे त्याच्या गँगकडून वारंवार सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येतात. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आणि त्यांचे सलमान खानशी कनेक्शन असल्यामुळे त्यांची हत्या केली, असं म्हटलं.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा सलमानला मोठा धक्का बसला आहे. त्याच्यावर मित्राच्या हत्येचा किती खोलवर परिणाम झाला आहे याबाबत झिशान सिद्दिकी यांनी स्वतः सांगितलं. १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली तेव्हापासून सलमान खान घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेत असल्याचं झिशान म्हणाले.

हेही वाचा – काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

काय म्हणाले झिशान सिद्दिकी?

“या घटनेनंतर सलमान भाई खूप अस्वस्थ झाले आहेत. बाबा आणि सलमान भाई सख्ख्या भावांसारखे होते. दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. वडिलांच्या निधनानंतर भाईंनी आम्हाला खूप साथ दिली. ते नेहमी माझी विचारपूस करत असतात. रोज रात्री ते माझ्याशी बोलतात आणि झोपू शकत नाही असं सांगतात. ते नेहमी आमच्या कुटुंबाच्या पाठिशी उभे होते आणि पुढेही राहतील”, असे झिशान सिद्दिकी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार

बिश्नोई टोळीतील काही लोकांनी सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार केल्यानंतर सहा महिन्यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या केली. इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले बाबा सिद्दिकी यांनी २०१३ मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील भांडण मिटवला होता. २००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान व शाहरुख खान यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर पाच वर्षे ते एकमेकांशी बोलले नव्हते. त्यांच्यातील नाराजी बाबा सिद्दिकी यांनी दूर केली होती.