अभिषेक तेली
संहितेचे वाचन, संवादाची उजळणी, कसदार अभिनय करण्यावर लक्ष आणि नेपथ्यासह प्रकाशयोजनेत आवश्यक ते बदल करण्यावर भर देऊन सध्या राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये एकांकिकांच्या तालमीचे फड रंगले आहेत. सर्वत्र ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा उत्साही माहोल पाहायला मिळतो आहे. महाविद्यालयीन स्तरावर नावाजलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला असून लेखक – दिग्दर्शक आणि आजी – माजी विद्यार्थ्यांमध्ये एकांकिकेच्या अनुषंगाने सखोल संवाद होतो आहे.
कलाकारांसाठी रंगभूमी ही ‘श्वास’ असतो. त्यामुळे रंगभूमीचे पावित्र्य राखण्याचे काम विद्यार्थी जबाबदारीपूर्वक करीत आहेत. एकांकिकेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिस्तीला खूप महत्त्व असते. त्यामुळे तालीम सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून तालमीची जागा साफ करण्यासह दिवसभर त्याठिकाणी स्वच्छता राखण्याचे काम केले जाते. पाण्याच्या बाटल्या, बॅग, चपला बाजूला एका रांगेत ठेवल्या जाणं आदी कामं केली जातात. एकांकिकेमध्ये समूहातील प्रत्येक जण हा महत्त्वाचा असल्यामुळे दिलेल्या वेळेत संपूर्ण समूह तालमीच्या ठिकाणी हजर राहणं बंधनकारक असतं. परिणामी, विद्यार्थ्यांकडून वेळेचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.
एकांकिका म्हटलं की अनेक महाविद्यालयांमध्ये तालमीच्या जागेचा प्रश्न हमखास येतो, पण सध्या काही महाविद्यालयांतील प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून तालमीसाठी महाविद्यालयातील भलेमोठे सभागृह उपलब्ध करून दिले गेले आहेत. तर काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना तालमीच्या दरम्यान चहा, नाश्ता व जेवणाची सोयही केली जाते. त्याचबरोबर तालीम संपल्यानंतर सांस्कृतिक समन्वयकांकडून दिवसभराचा आढावाही घेतला जातो. तर काही महाविद्यालयांमध्ये आजही तालमीसाठी मोठी जागा अथवा सभागृह उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थी तालीम सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील एक वर्ग शोधतात, तेथील बाके उचलून बाजूला ठेवतात आणि त्यानंतर वर्गातील मोकळय़ा जागेत तालमीला सुरुवात करतात. या धावपळीतून नकळतच शारीरिक व्यायामही होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पण ताजेतवाने राहण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित व्यायाम आणि प्रार्थनेने तालमीची सुरुवात होते. मनात सुरू असलेले बाहेरचे सर्व विचार दूर करून लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरुवातीला एकत्र ओंकार घेतला जातो आणि मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सशक्त राहण्यासाठी सूर्यनमस्कारही घातले जातात.
अनेक महाविद्यालयांमध्ये तालमीदरम्यान आजी – माजी विद्यार्थी आणि लेखक – दिग्दर्शकांमध्ये एकांकिकेतील प्रसंगांवर चर्चा केली जाते. संबंधित प्रसंग आवश्यकतेनुसार अधिक प्रभावी कसा करता येईल, त्यावर भर दिला जातो. नेपथ्य, रंगभूषा व वेशभूषेत आवश्यकतेनुसार बदल केले जात आहेत. त्याचबरोबर सादरीकरणातील चुका कळण्यासाठी काही महाविद्यालयांत मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांना बोलावून मार्गदर्शनपर सूचना घेतल्या जात आहेत. सध्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकारही स्वत:च्या महाविद्यालयांमध्ये हजेरी लावत आहेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तर आरोग्याच्या दृष्टीने काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रयोगाच्या आधी स्वत:ला तेलकट पदार्थ खाण्यापासून व थंड पेयांपासून दूर ठेवलं आहे. पण तालमीदरम्यान ब्रेकमध्ये एकत्र येत मोठा गोल करून घरातील जेवणाचा एकत्रित आनंद घेतला जात आहे.
विविध अनुभव आणि अविस्मरणीय किश्शांसह तालमी रंगतायेत. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागांमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी चुरस निर्माण झाले आहे. विविधांगी आशय आणि तांत्रिकदृष्टय़ा एकांकिका सशक्त करण्यावर सर्वच महाविद्यालयांनी भर दिला आहे, त्यामुळे यंदा कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरेल याकडे नाटय़वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नाटकाच्या तालमीसह परीक्षेचा अंक
सध्या काही महाविद्यालयांमध्ये सत्र परीक्षांचा हंगाम सुरू आहे. परंतु परीक्षेवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी तालमीला हजेरी लावत आहेत. नाटय़कला जोपासत परीक्षेलाही ते प्राधान्य देत असून वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला आहे. तालमीदरम्यान फावल्या वेळेत कोणी िवगेत तर कोणी कोपऱ्यात बसून पुस्तकांत डोकावतो आहे. तर काही जण एकत्र गोल करून परीक्षेसंदर्भात चर्चा करीत आहेत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना काही अडचण आल्यास सीनिअर्स जुनिअर्सच्या शंकांचे निरसन करीत आहेत. तर नियमित महाविद्यालयांपेक्षा रात्र महाविद्यालयातील तालमीची गणिते ही वेगळी असतात. नियमित महाविद्यालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत तालीम असते, परंतु रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी दिवसभर कामावर असतात आणि मग त्यानंतर महाविद्यालयात येतात. रात्र महाविद्यालयात तालीम ही सायंकाळी सात ते दहा असते. त्यामुळे काही विद्यार्थी हे परीक्षा देऊन शेवटच्या एका तासासाठी तरी तालमीसाठी हजर आहेत.
वेळेचे चोख नियोजन
सध्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसह इतरही एकांकिका स्पर्धा सुरू आहेत, मात्र तासनतास तालीम आणि वेळेचे चोख नियोजन करून विद्यार्थी सर्व स्पर्धामध्ये सारख्याच ऊर्जेने सहभागी होत आहेत. अनेक स्पर्धा एकाच वेळी सुरू असल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांची धावपळ होते आहे, मात्र विद्यार्थी, लेखक – दिग्दर्शकांमध्ये आणि मुख्यत्वे आयोजकांमध्ये योग्य समन्वय साधला जातो आहे.
परिणामी, कोणतीही गडबड न होता विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे जवळून शिकता येत आहेत. या सर्व उत्साही धावपळीतून एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असून सादरीकरण उत्तम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे.
मुख्य प्रायोजक
’सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक
’झी टॉकीज
’भारती विद्यापीठ, पुणे
’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट
पॉवर्ड बाय
’केसरी टूर्स
’शिवामृत दूध उत्पादक सहकारी
संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर
’श्री नेमिनाथ ज्वेलर्स
’एन एल दालमिया इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
अँड रिसर्च
साहाय्य
’अस्तित्व
टॅलेंट पार्टनर
’आयरिस प्रॉडक्शन