‘शिप ऑफ थिसीएस’ आणि ‘तुंबाड’सारख्या चित्रपटांमुळे आनंद गांधी हे नाव परिचयाचं झालं. नुकतंच त्यांनी यावर्षीचा जबरदस्त हीट ठरलेला कन्नड चित्रपट ‘कांतारा’बद्दल मत व्यक्त केलं. ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर साऱ्या जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी या चित्रपटाची तुलना थेट ‘तुंबाड’शी केली आहे. याबद्दलच आनंद गांधी यांनी खुलासा केला होता.

ट्वीट करत आनंद म्हणाले होते, “कांतारा तुंबाडसारखा अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.” त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी आनंद यांना ट्रोल केलं तर काहींनी त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला.

आणखी वाचा : नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले “हे अनैतिक…”

‘कांतारा’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनमुळे त्यांची तुलना होत आहे. दोन्ही चित्रपटांचं बजेट कमी असूनही त्यांनी बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केल्याने यांची तुलना होताना दिसत आहे, बहुतांश लोक मात्र ही तुलना योग्य नाही असंच म्हणताना दिसत आहेत.

आनंद यांच्या या ट्वीटनंतर #तुंबाड सोशल मीडियावर ट्रेंड होत असून लोकांनी दोन्ही चित्रपटांची तुलना करणं व्यर्थ आहे असं स्पष्ट केलं आहे. ‘तुंबाड’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहेरा मोहराच बदलून टाकला. याला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळेच आजही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटासाठी विशेष जागा आहे. तुंबाडप्रमाणेच रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या चित्रपटाने ४०० कोटीची कामावून वेगळाच इतिहास रचला आहे. कन्नड चित्रपटविश्वातील ‘कांतारा’ एक महत्त्वाचा चित्रपट आहे.

Story img Loader