डॅडी या नावाने प्रसिद्ध असलेले डॉन अरुण गवळी यांचा चरित्रपट नव्हे, पण त्यांची व्यक्तिरेखा आणि त्यांच्या प्रसिद्ध दगडी चाळीचा आधार घेऊन उभा राहिलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता त्याचा पुढचा भाग चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने, एकूणच अरुण गवळी आणि त्यांच्या दगडी चाळीवरचा पहिला चित्रपट, त्याला मिळालेली लोकप्रियता आणि दुसरा भाग करतानाचा अनुभव याबद्दल चित्रपटातील कलाकार मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत आणि दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयातील भेटीत मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुण गवळी यांचा चरित्रपट नसला, तरी त्यांची व्यक्तिरेखा होती. दगडी चाळ होती आणि तिथे घडणारी ही कथा असली तरी पूर्ण गँगवॉरपट न करता निखळ कौटुंबिक नाटय़ असलेला चित्रपट आम्हाला बनवायचा होता आणि पहिल्या चित्रपटाला जे यश मिळालं त्यातून प्रेक्षकांना ते आवडलं आहे. त्यामुळे दुसरा भागही असाच कौटुंबिक मनोरंजन करणारा असेल, यावर आमचा भर होता, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी दिली.

सध्या मराठी चित्रपट सातत्याने प्रदर्शित होतात, मात्र कित्येकदा हिंदी चित्रपटांमुळे मराठीला योग्य शो मिळत नाहीत, अशी परिस्थिती असते. याबद्दल बोलताना, कोणताही चित्रपट जर चांगला असेल तर तो पाहायला प्रेक्षक येणारच. ते त्यांच्या मेहनतीचे पैसे देऊन तिकीट घेतात, त्यामुळे चित्रपट त्यांचं मनोरंजन करणारा असावा, ही त्यांची अपेक्षा साहजिकच आहे. एकदा त्यांना चित्रपट आवडला की आपोआप मराठी चित्रपट असला तरी तो प्राइम टाइमला येतोच, असा विश्वास अभिनेता अंकुश चौधरीने व्यक्त केला. तर कितीही झालं तरी हिंदीचा मोठा चित्रपट येतो आहे म्हणून चालणारा मराठी चित्रपट उतरवणं हे कधीही चुकीचंच आहे, असं मत या चित्रपटात डॅडींची भूमिका करणारे अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केले.

भाषेपल्याड पोहोचलेला चित्रपट
मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये साधारण फरक असतो तो बजेटचा. बजेटमुळे पटकथेवर परिणाम होतो. या चित्रपटात काम करत असताना नट म्हणून मला अजिबात वाटलं नाही की, मी मराठी सेटवर आहे. तर एका चांगल्या चित्रपटाच्या सेटवर आहे, ही भावना मनात होती आणि त्याचा भाग होता आलं याबद्दल आनंद वाटत होता. करायचं म्हणून ते केलेलं काम नव्हतं, असं मकरंद यांनी सांगितलं. दुसरा भाग करतानाही पहिला चित्रपट यशस्वी असल्याने एक उत्साह होता आणि इतर लोकांनाही या चित्रपटाच्या यशाविषयी माहिती होती. म्हणजे बॉलीवूडमधील लोकांनाही या चित्रपटाचं अप्रूप वाटत होतं. त्यामुळे आता भाषेपल्याड गेलेला, लोकांच्या मनात पोहोचलेला हा मराठी चित्रपट आहे, असं मला वाटतं. म्हणजे दाक्षिणात्य भाषेतही डब होऊ शकेल इतका हा चित्रपट लोकांना आवडला असल्याचं मकरंद यांनी सांगितलं.

पहिल्या-दुसऱ्याची तुलना व्हायलाच हवी..
चित्रपट मालिका करत असताना पहिला चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग याची तुलना केली जाते. अशी तुलना व्हायलाच हवी, असं मत मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केलं. पहिला चित्रपट तुम्ही बघता तेव्हा त्यातल्या व्यक्तिरेखा तुमच्या होतात. मग हक्काने तुम्ही दुसरा भाग बघता. आपल्या अपेक्षा वाढतात, त्या कधी पूर्ण होत नाहीत किंवा कधी वेगळंच काही तरी पाहायला मिळाल्याचा आनंद होतो. त्यामुळे दुसऱ्या भागाबद्दलची चिंता नसते, लोकं उत्सुकतेनेच बघायला येतात. फार तर तिसरा करताना चिंता वाटू शकते, असं मकरंद सांगतात. कित्येकदा दुसरा भाग पहिल्यापेक्षा लोकप्रिय होतो असंही घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी दिघ्याची वाट पाहतो आहे..
दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’ या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. या चित्रपटात अंकुश पुन्हा त्याची दिघ्याची लोकप्रिय भूमिका साकारणार का? या प्रश्नावर उत्तर देताना दिघ्या पुन्हा साकारायला नक्कीच आवडेल, मात्र खरोखरच पहिल्या चित्रपटातील व्यक्तिरेखा या नव्या चित्रपटात आहेत की नाही याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. खरं तर, ‘दुनियादारी’ करतानाही आमची म्हणजे मी, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आमची ऑडिशन होऊन निवड झाली होती; पण नंतर निर्माते बदलले. मग त्यांनी वेगळय़ाच कलाकारांची ऑडिशन घेऊन काम सुरू केलं, पण मग तेही बंद पडलं. नंतर संजय जाधव यांनी चला, आपण आता हा चित्रपट करू या म्हणत आमच्याबरोबर काम सुरू केलं, अशी आठवण अंकुशने सांगितली. त्यामुळे आताही काही बोलण्यापेक्षा खरोखरच ही भूमिका माझ्याकडे येते आहे का, याची वाट पाहतो आहे, असं त्याने सांगितलं.

मालिकेत काम नाही..
छोटा आणि मोठा पडदा असा फरक मी करत नाही. मी खूप चित्रपट करत नाही, पण जे करतो त्याच्या प्रक्रियेत खूप सहभागी असतो, असं अंकुशने सांगितलं. या चित्रपटावरही आम्ही दीड वर्ष काम करतो आहोत. त्यामुळे मी नाटकही करू शकत नाही. मी जिथे रमतो त्या रंगभूमीवरही मला त्यामुळे काम करता येत नाही. सध्या मालिकांसाठी महिन्यातून २०-२५ दिवस देणं शक्य नसल्यानेच फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलं आहे, असं अंकुशने स्पष्ट केलं.

डॅडींच्या भूमिकेचा आभास..
मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळी यांच्या दिसण्यापासून अभिनयापर्यंत अगदी हुबेहूब डॅडी साकारल्याबद्दल त्यांचे कौतुक होते आहे; पण या भूमिकेसाठी म्हणून पहिल्या चित्रपटाच्या वेळीही आपण अरुण गवळी यांना भेटलो नव्हतो, असं मकरंद यांनी स्पष्ट केलं. डॅडी म्हणून आवश्यक असलेला दरारा मला या भूमिकेत आणायचा होता. न्यायप्रिय, एक माया असलेला माणूस आणि त्यांचा तो पेहराव सगळं योग्यरीत्या आणायचं होतं ते मी चोख केलं. त्यांचा आभास मला या भूमिकेतून निर्माण करता आला, असं मकरंद सांगतात. अर्थात त्यासाठी समाजमाध्यमांवर त्यांच्याबद्दल जे उपलब्ध होतं, ते सगळं पाहिलं. त्यांच्या स्थिरचित्रांचीही मदत झाली. स्थिरचित्रंही हळूहळू बोलकी होतात, त्यामुळे त्यांचा उपयोग करता आला, असं ते सांगतात. शिवाय, त्या वेळची जी परिस्थिती होती त्याचा अभ्यास ‘सत्या’ करत असतानाच झाला होता. नव्वदच्या काळातील गँगवॉर आणि त्या परिस्थितीचा, तशा प्रकारच्या व्यक्तिरेखांचा एक अभ्यास झाला होता, त्याचाही फायदा झाला. काही व्यक्तिरेखा इतक्या प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा स्वरूपाच्या असतात, की त्या जेवढय़ा लांबून दिसतात तेवढय़ा त्या जास्त आकळतात. खूप जवळ गेल्यानंतर त्या तशाच जाणवतील असं नाही. त्यामुळे डॅडी मला जसे दिसले तसं मी ते अंतस्थ वृत्तीने करत गेलो, असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagadi chwale 2 arun gawli biography displayed character amy
Show comments