‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाची सर्वत्र खूप चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनाही हा चित्रपट पसंतीस पडला आहे. ‘भूत कोला’ या पारंपारिक कन्नड प्रथेचा प्रभाव या चित्रपटावर प्रकर्षाने जाणवतो. रिषभ शेट्टी यांनी ‘कांतारा’चे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. त्याशिवाय त्यांनी शिवा हे चित्रपटामधील मध्यवर्ती पात्र साकारले आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांवर एका मल्याळम बॅन्डने त्यांनी तयार केलेले गीत चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा’ चित्रपटामध्ये श्रीविष्णूच्या वराह अवताराचा खास उल्लेख आढळतो. चित्रपटामधील ‘वराह रुपम’ या गाण्याद्वारे वराह देवतेची स्तुती करण्यात आली आहे. चित्रपटातील हे गीत एका प्रकारे त्याची ओळख बनले आहे. संगीतकार अजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केले असून साई विघ्नेश यांनी ते गायले आहे.
‘थाईकुडम ब्रिज’ (Thaikkudam Bridge) या केरळमधील म्युझिकल बँडने या गाण्याच्या चालीवर आपली मालकी असल्याचा स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी ‘कांतारा’ची निर्मिती करणाऱ्या होंबळे फिल्म्स या निर्मिती संस्थेने त्यांचे २०१७ मध्ये प्रदर्शित ‘नवरसम’ हे गीत चोरल्याचा आरोप केला आहे. या संबंधित मुद्द्यावर बॅंडच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ‘थाईकुडम ब्रिज’मधल्या सदस्यांनी ‘नवरसम’ हे गीत एकत्र मिळून तयार केले आहे. विपिन लाल यांनी हे गीत गायले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी “आमचा आणि आमच्या बँडचा ‘कांतारा’ चित्रपटाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे आम्ही श्रोत्यांना सांगू इच्छितो. कांतारामधील ‘वराह रुपम’ आणि आमच्या ‘नवरसम’ गाण्यामध्ये समानता असल्याचे पाहून त्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचे आमच्या लक्षात आले आहे. आमच्या टीमच्या मते, एखाद्या गोष्टीवरुन प्रेरणा घेणे आणि ती गोष्ट चोरणे यात फरक आहे. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला किंवा टीमला शोधून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांनी तयार केलेल्या गाण्यावर आमचा किंवा आमच्या गाण्याचा उल्लेख आढळत नाही. याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहचवावी अशी आम्ही सर्व श्रोत्यांना विनंती करतो. तसेच अन्य कलाकारांना आवाज उठवण्यासाठी आवाहन करतो”, असे लिहिले आहे.