आजचं सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वास्तव इतकं अराजकतावादी झालेलं आहे की त्यावर काही कलात्मक प्रतिक्रिया देऊ जाणं, त्यावर काहीएक भाष्य करणं अवघडच नाही, तर जवळजवळ अशक्यच झालेलं आहे. त्याची कारणं बरीच आहेत. मूल्यांचा अंत, तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांमुळे समोर उभ्या ठाकलेल्या समस्या, एकीकडे जग भौतिकदृष्ट्या जवळ येत असताना संकुचित अस्मिता, स्वार्थांधता, आपमतलबीपणा, ‘मी’शिवाय काहीच महत्त्वाचं नाही इथवर माणसाची गेलेली मजल, जगभर उजव्या शक्तींची झालेली अपरिमित वाढ… पर्यायानं उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आदी मूल्यांची झालेली/होत असलेली गळचेपी, वाढता सार्वत्रिक दहशतवाद, उपटसुंभ नेत्यांकडे गेलेलं जगाचं नेतृत्व अशा अनेकानेक कारणांनी सध्या जगभरातली माणसं संभ्रमित झालेली आहेत. काय चूक, काय बरोबर याची निवड करणंही त्यांना कठीण होत आहे. त्यातूनच हळूहळू ती निष्क्रिय बनत चालली आहेत. ‘मला काय त्याचे?’ असा त्यांचा दृष्टिकोन बनला आहे. त्यामुळे सत्य, मानवता, सहिष्णुता, उदारमतवाद ही मूल्यं जवळजवळ लोप पावत चालली आहेत. एकूणच आजूबाजूला अराजकाचं राज्य निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. बरं, याबद्दल कुणी आवाज उठवलाच, तर त्याला भयंकर ट्रोल करून जगणं मुश्कील करून सोडलं जातं. त्यासाठी ‘ट्रोल’धाडी पाळल्या गेल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी सामाजिक जागलेपणाची भूमिका घेणारेही कोणत्याच बाबतीत व्यक्त व्हायला कचरू लागले आहेत. खोटा राष्ट्रवाद त्यांना नेस्तनाबूत करायला सज्ज आहेच. एकुणात काय, ह्यमाणूसह्ण म्हणून जगणं दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललं आहे. आणि याबद्दल व्यक्त व्हायचं ठरवलंच कुणी… तर त्याला स्वतंत्र बाण्याची माध्यमं तरी उपलब्ध आहेत का व्यक्त व्हायला? तिथेही निराशाच पदरी पडते. अशा मिट्ट काळोख्या रात्री कुणी व्यक्त व्हायचं म्हटलंच तर त्याला एकच माध्यम उपलब्ध आहे… ते म्हणजे असंगतता! आविष्कार निर्मित, योगेश्वर बेंद्रे लिखित आणि संदेश दुगजे दिग्दर्शित ‘गोळकोंडा डायमंड्स’ हे असं आजच्या परिस्थितीवर भाष्य करू इच्छिणारं असंगत नाटक आहे. नुकतंच ते पाहण्याचा योग आला. गेल्या वर्षी एनसीपीएच्या ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेतील हे विजेते नाटक. मात्र, त्यावेळी त्यात असलेली धार आता प्रयोगात बोथट झालेली जाणवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौस्तुभ आणि गंधर्व हे दोघं ट्रेन प्रवासात आपल्या इच्छित स्टेशनावर न उतरल्याने पुढे कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या स्थळी येऊन पोहोचतात. मधेच टीसी त्यांना याची जाणीव करून देतो आणि एका भलत्याच स्थानकावर जबरदस्तीने उतरवून देतो. पण तिथे त्यांच्या लक्षात येतं की इथे कुठलीही गाडी येत नाही आणि इथूनही कुठली गाडी जात नाही. इथे मोबाईललाही रेंज नसल्याने इंटरनेट कनेक्शनही नाही. त्यामुळे आपल्याबद्दल कुणाला कळवायचीही काही सोय नाही. सुरुवातीला स्वत:तच मग्न असणारे हे दोघं मग नाइलाजानं एकमेकांशी बोलू लागतात. एकमेकांची वास्तपुस्त करतात. त्यातला गंधर्व छोटंसं होम थिएटर चालवत असतो आणि पैशांसाठी एका कट्टरतावादी पक्षाच्या आयटी सेलमध्ये काम करत असतो. त्यांच्या विरोधकांबद्दल फेक न्यूज पसरवणं, त्यांना ट्रोलिंग करणं वगैरे गोष्टी तो करत असतो. त्याला ते मान्य नसतं. पण पापी पेट का सवाल त्याला ते करण्यास भाग पाडत असतो. नाहीतर तो स्वत: मूळात एक पुरोगामी, उदारमतवादी, सहिष्णु माणूस असतो. आजूबाजूला घडर्णा या घटना त्याला अस्वस्थ करत असतात. पण तो हतबल झालेला आहे. स्वत:वर चरफडत राहण्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. त्याचं गाव, त्याची जवळची माणसं कुठे आहेत हेही त्याला माहीत नसतं. जणू तो अधांतरी जगत असतो. कौस्तुभ हा एका आयटी कंपनीचा सीईओ असतो. पण नुकतंच त्याला कंपनीतल्या राजकारणातून कपटकारस्थान करून हाकलून दिलं गेलेलं असतं. माया नावाच्या त्याच्या सहकारीला हाताशी धरून त्याला बदनाम करण्यात आलेलं असतं आणि आयुष्यातून उठवलं गेलेलं असतं. असे ते दोघे… आयुष्याला वैतागलेले… कसलंच भविष्य नसलेले… पुढे काय होणार, काय करायचं हे ठाऊक नसलेले.

तिथे कुठूनतरी अचानक उपटलेला एक म्हातारा त्यांना भेटतो. तो त्यांच्या पूर्वजांची गोष्ट त्यांना सांगतो… गोळकोंडा डायमंड्सची. आता तो डायमंड वारशानं त्यांच्यापाशी येतो. हा डायमंड जनतेतील अस्वस्थतेला उद्गार देणारा असतो. आजूबाजूला जे चाललंय त्याचा विरोध करण्याची ताकद त्यांना त्यातून प्राप्त होणार असते.

लेेखक योगेश्वर बेंद्रे यांनी आजच्या अस्वस्थ वर्तमानाला या नाटकाद्वारे हात घातला आहे. माणसांची अगतिकता त्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यासाठी असंगततेचा आधार त्यांनी घेतला आहे. पण त्याची मांडणी त्यांनी फारच क्लिष्ट केली आहे. जरा कुठं काही त्यांना जे म्हणायचं आहे ते थोडंसं समजू लागेतो ते तिसरंच काहीतरी उपस्थित करतात आणि आशयात बोजडपणा आणतात. मूळ नाटक बऱ्यापैकी थेट होतं. पण आता बदललेलं नाटक आपला आत्मा गमावून बसलंय की काय असं वाटतं. यातली सर्वव्यापी मतिश शहा ही व्यक्ती किती भयानक असू शकते याचा प्रत्यय येतो खरा; पण तो परिणाम कायम टिकत नाही. प्रेक्षक अंधुक आशयापर्यंत पोहोचेतो त्याला भलतीच कलाटणी मिळते. दिग्दर्शक संदेश दुगजे यांनी प्रयोग प्रभावीपणे बांधला आहे. आपण आज नेमकं कुठं आहोत, काय करतो आहोत हे न समजणारं ठिकाण आजच्या अराजकसदृश वास्तवाला धरून आहे. मूलत: उदारमनस्क, सहिष्णु असलेली माणसं धर्मांधता, स्वार्थांधता यात आता कशी बुडत चालली आहेत, तुमच्या अस्तित्वावरच कसा घाला घातला जातो आहे आणि तुम्ही विरोध केल्यास तुम्हाला नष्ट करायलाही त्या शक्ती कशा मागेपुढे पाहत नाहीत… हा आशय व्यक्त करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. सगळ्या कलाकारांची कामंही उत्तम झाली आहेत. कौस्तुभ झालेले योगेश्वर बेंद्रे चक्रव्यूहात अडकलेल्या माणसाची तडफड उत्कटपणे व्यक्त करतात. एका कटकारस्थानाचे बळी ठरलेल्या व्यक्तीची तगमग, कोसळणं त्यांनी शारीर बोलीतून समूर्त केलं आहे. गंधर्वाच्या भूमिकेतील ओंकार मोरे यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा बळी ठरलेला माणूस त्याच्या सगळ्या यातनांसह प्रकट केला आहे. मूलत: सत्प्रवृत्त, पण जगण्यासाठी तत्त्वांशीच तडजोड करावी लागल्याने आतून घुसमटणारा गंधर्व त्यांनी प्रत्ययकारी केला आहे. गोष्ट सांगणारा म्हातारा उदित पाटील यांनी प्रभावीरीत्या पेश केला आहे. दहशतवादाचं प्रतीक असलेला एजंट ओंकार सातपुते यांनी पुरेशा तडफेनं साकारला आहे. मायाचं मायावी रूप ऋतुजा शिंदे यांनी छान वठवलं आहे.

मंगेश महाजन यांचं संगीत आशयाला उठाव देणारं आहे. मोजक्या प्रॉपर्टीतून साईश पेडणेकर यांनी स्थळ-काळाचं भान दिलं आहे. मानसी माणगावकर आणि रूपेश शेंडे यांची वेशभूषा पात्रांना बाह्य पेहराव देते. मयूर शिंदे यांची प्रकाशयोजना नाट्यपूर्णतेत भर घालणारी. प्रतीक्षा फडके यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. एकुणात आजच्या अराजकवादी परिस्थितीवर काहीएक भाष्य करण्याचा प्रयत्न ‘गोळकोंडा डायमंड्स’ करतं, हे निश्चित.