संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेबसीरीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संजीदा शेख लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र अनेकवेळा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शातच अभिनेत्रीचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता आमिर अलीने एका मुलाखतीमधून दोघांच्या नात्यांमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गल्लाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर अलीने म्हटले आहे की, मुलींनी कोणते कपडे परिधान केले यावरुन त्यांचे परीक्षण केले जाते. तसेच काहीही वाईट झाले, चुकीचे घडले किंवा जसे ठरवले होते तसे काही घडले नाही तर लगेच मुलांना दोषी ठरवले जाते.

‘घटस्फोटानंतर मी माझे अनेक मित्र गमावले’ या संजनाच्या वक्तव्याबाबत आमिरला म्हटले आहे की, तिने काय म्हटले, काय नाही मला माहित नाही. तिच्या आयुष्यात ती जे काही करत आहेत, त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की प्रगती करण्यापासून कोणी तु्म्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही जाऊ शकता, तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकता. मी त्यावर बोलणारा कोण आहे. आपण सगळेच वेळेप्रमाणे मोठे होत असतो. पुढे तो म्हणतो, “लोकांना जो विचार करायचा आहे, तोच विचार ते करणार आहेत. माझ्या खासगी आयुष्याविषयी लोकांमध्ये बोलून ते परत खोडून काढत बसणे हा प्रकार मला आवडणार नाही. जे काही झाले आहे आणि लोक जे काही बोलत आहेत त्या आमच्या दोघांमधल्या गोष्टी आहेत. जर आम्ही त्यावर सार्वजनिकरित्या बोलू तर लोक बोलणारच आहेत. लोक तसेही बोलणारच आहेत, त्यांना बोलू दे. माझ्यासाठी ते महत्वाचे नाही. जे लोक मला ओळखतात, ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि मला वाटतं लोकं हुशार आहेत, त्यांना परिस्थिती काय आहे याची जाणीव आहे.”

हेही वाचा : “माझ्या अंगावरचे डाग…”, कर्करोगाशी सामना करणाऱ्या हिना खानचा चाहत्यांना प्रश्न, म्हणाली…

आमिर अलीने याबाबत अधिक बोलताना म्हटले आहे की, मी माझा लढाया स्वत: लढतो. माझी दु:ख इतरांना सांगावीत असे मला वाटत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे लोकांना कळावे असे वाटत नाही. तुम्ही तुमच्या चांगल्या आणि वाईट काळातून अनेक गोष्टी शिकत असता. मला वाटतं, काही लोकं काही ठराविक काळासाठी तुमच्याबरोबर असतात. त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवावा आणि पुढे जावे. जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी वाईट भावना ठेवल्या तर तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. ज्या दिवशी मी माफ करायला शिकलो त्या दिवशी माझी वाईट काळातून बाहेर येण्याचा प्रवास सुरु झाला असे आमिर अलिने म्हटले आहे. वडील म्हणून त्याच्या काय भावना आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले आहे की, ही खूप संवेदनशील बाब आहे. मी असे काही बोलू इच्छित नाही ज्याचा नंतर मला किंवा इतर कोणाला त्रास होईल. माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला माझ्या शुभेच्छा आहेत.

हेही वाचा : मल्लिका शेरावतबरोबर २० वर्षांपूर्वी झालेल्या भांडणावर इमरान हाश्मी म्हणाला, “आयुष्यात एक वेळ अशी येते…”

अभिनेत्रीने यापूर्वी ‘गलाट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, घटस्फोटानंतर तिने बरेच मित्र गमावले आहेत. ती म्हणाली, “ माझे असे काही मित्र आहेत जे घटस्फोटानंतर माझ्या आयुष्यात राहिलेनाहीत. पण आनंदी आहे. आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला इतक्या लोकांची गरज नसते हे असे अनुभवच तुम्हाला शिकवतात. त्यांनी माझ्याबरोबर जे केले ते चांगले आहे.” याबरोबरच मी स्वत:ला प्राधान्य दिल्याचेदेखील संजीदाने म्हटले होते.

दरम्यान, संजीदा आणि आमिर यांची २००७ ला ‘क्या दिल में है’ या मालिकेदरम्यान भेट झाली होती. एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१८ मध्ये सरोगसीद्वारे एक मुलगी झाली. मात्र २०२० मध्ये त्यांनी विभक्त होण्याचे घोषित केले आणि २०२१ ला घटस्पोट घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heeramandi fame actress sanjeeda shaikh ex husband aamir ali reveals things of their relationship nsp
Show comments