बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटाला पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश सरकारने टॅक्स फ्रीची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली होती. दरम्यान नुकतंच याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी उत्तर दिले आहे. या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील नेमकं काय म्हणाले?
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले.
दरम्यान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील इंतेझार हुसेन सईद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुस्लिम समुदायाबद्दल चुकीचे चित्र दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल एकतर्फी भाष्य केले जात आहे. यामुळे हिंसाचार होण्याची शक्यता आहे, असे या याचिकेत म्हटले होते.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींना दिलासा मिळाला होता.
प्रतीक्षा संपली, तारीख ठरली…! ७५ दिवसानंतर ‘सरसेनापती हंबीरराव’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना त्यांचे अश्रू आवरता आलेले नाही.