दहीहंडी सोहळ्यांमध्ये विविध ठिकाणी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनी वर्णी लावली होती. मात्र, यामध्ये बॉलीवू़ड सुपरस्टार हृतिक केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने न जाता आदिवासी मुलींसाठी निधी जमा करण्यासाठी गेला होता. हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला गजबजाटापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण, नुकताच पार पडलेल्या दहीहंडीच्या उत्सवात जाण्यापासून हृतिक स्वतःला आवरु शकला नाही. कारण, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवामध्ये एका स्वयंसेवी संस्थेअंतर्गत आदिवासी मुलींसाठी निधी गोळा करण्यात येणार होता.
हृतिक म्हणाला की, मला डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले असून अती गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे. हे योग्य असले तरी तुम्ही जेव्हा कोणालाही प्रेम देता तेव्हा कोणतीच गोष्ट तुम्हाला हानी पोहचवत नाही. मला एकदम सुरक्षित वाटत होते. जेव्हा कोणीतरी इतरांसाठी काही चांगले करत असेल, तेव्हा त्यात सहभागी होणे आनंददायी असते. तसेच, हा कार्यक्रम सामाजिक कार्यासाठी होता त्यामुळे मी तिथे जाण्याचे ठरवले, असेही तो म्हणाला.