भारतीय इतिहासातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची विमान अपहरणाची घटना म्हणून १९९९ साली झालेल्या ‘आयसी ८१४’ या विमान अपहरणाच्या घटनेचा उल्लेख होतो. नेपाळच्या काठमांडूहून भारतातील दिल्लीपर्यंत येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ या विमानाचे उड्डाण केल्यानंतर काही क्षणांत पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले. अपहरण केलेले हे विमान १८० प्रवाशांसह सात दिवस अफगाणिस्तानात कंदाहार येथे ठेवण्यात आले होते. या अपहरणात एका तरुणाला आपला जीवदेखील गमवावा लागला होता. हे अपहरण नक्की का करण्यात आले? अपहरणकर्त्यांचा नेमका उद्देश काय होता? हे त्या घटनाक्रमासह सविस्तर समजावून घेण्याची संधी ‘आयसी ८१४ – कंदाहार हायजॅक’ या वेबमालिकेतून मिळणार असल्याची माहिती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘आयसी ८१४ – कंदाहार हायजॅक’ ही अनुभव सिन्हा दिग्दर्शित वेबमालिका २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिस या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. या वेबमालिकेत सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेला तरुण कलाकार विजय वर्मा, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा हे अनुभवी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री पत्रलेखा आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. जगभरात चर्चिले गेलेले हे अपहरणनाट्य वेबमालिकेच्या माध्यमातून साकारण्याचा अनुभव कसा होता, याविषयी अनुभव सिन्हा यांच्यासह विजय वर्मा आणि दिया मिर्झा यांनीही मनमोकळेपणाने माहिती दिली.

हेही वाचा : सलीम-जावेद यांची जोडी का दुभंगली?

‘आयसी ८१४ – कंदाहार हायजॅक’ ही मालिका का करावीशी वाटली? यापेक्षा या अपहरणनाट्यात घडलेल्या घटना लक्षात घेतल्या तर अनेक प्रश्न पडतात. सात दिवस या विमानातील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते तेव्हा नेमकं काय घडलं? अपहरणानंतर विमान कंदाहारलाच का घेऊन गेले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत या मालिकेची मांडणी करण्यात आली आहे, असे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सांगितलं. तीन वर्षांपासून या मालिकेचं काम सुरू होतं, ब्रिटिश पत्रकार एट्रीयन लेव्ही यांनी या मालिकेचं लेखन, संदर्भ यासाठी खूप मदत केली, असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

‘मिस एशिया पॅसिफिक’ हा किताब जिंकून अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर झालेली अभिनेत्री दिया मिर्झा या मालिकेत पत्रकाराच्या भूमिकेत आहे. या विमान अपहरणाची घटना घडली तेव्हा मी फक्त १७ वर्षांची होते आणि मुंबईत तेव्हा विश्वसुंदरी स्पर्धेसाठी तयारी करत होते, अशी आठवण दियाने सांगितली.

ज्या काळात ही घटना घडली तेव्हा दूरचित्रवाहिनी माध्यमांनी नुकतेच २४ तास मनोरंजन सेवा देण्यास सुरुवात केली. त्या वेळी एखादी घटना घडल्यानंतर सविस्तर माहितीसाठी वर्तमानपत्रावरच जोर दिला जात होता. सामान्य जनतेकडून वृत्तवाहिन्यांपेक्षा वर्तमानपत्रांवर भर असायचा. शिवाय, त्या वेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाणही तुलनेने कमी होते. त्यामुळे

कंदाहारसारख्या विमान अपहरणनाट्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मागोवा घेण्याची संधी त्या महिला पत्रकाराला मिळाली होती. तिला मिळालेली ही संधी एकाअर्थी तिचं या क्षेत्रातलं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी होती हा सगळा तत्कालीन वास्तवाचा भाग लक्षात घेऊन मला भूमिका करता आली, याचा खूप आनंद वाटतो, अशी भावना दिया मिर्झाने व्यक्त केली.

हेही वाचा : नाट्यरंग: ‘मन’ वढाय वढाय…

दिग्गज कलाकारांना काम करताना पाहणं हा विलक्षण अनुभव ‘आयसी ८१४’ या वेबमालिकेत पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना केवळ काम करताना पाहणं हासुद्धा विलक्षण अनुभव होता, अशी भावना दिया मिर्झा हिने व्यक्त केली. या कलाकारांनी गेली अनेक वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात काम करून स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, त्यांच्यासाठी भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते, तर आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचवता येतं आहे याचा विचार करून ही मंडळी काम करतात. त्यांचे नुसते निरीक्षणही खूप काही शिकवून जाते, त्यामुळे त्यांच्याबरोबर या वेगळ्या विषयावर काम करायला मिळणं हीच भाग्याची गोष्ट ठरली, असंही तिने सांगितलं.

वैमानिकाची भूमिका पहिल्यांदाच…

‘डार्लिंग्ज’, ‘मर्डर मुबारक’सारख्या चित्रपटातून अनेकदा नकारी छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता विजय वर्मा याने या वेबमालिकेत पहिल्यांदाच वैमानिकाची भूमिका केली आहे. ‘या विमानाचे वैमानिक होते देवी चरण. त्यांची भूमिका मी केली आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला वास्तवात देवी चरण यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी खरोखरच त्या वेळी परिस्थिती कशी सांभाळली होती, त्यांच्या मनात काय काय विचार येऊन गेले होते या सगळ्याबद्दल मला जाणून घेता आलं आणि त्याचा भूमिकेसाठी फायदा झाला’ असं विजयने सांगितलं. शिवाय, या भूमिकेची गरज म्हणून विजयने वैमानिकाचे छोटेखानी प्रशिक्षण घेतले जेणेकरून त्याला विमानाची खऱ्या अर्थाने तोंडओळख झाली, असं तो म्हणतो. चित्रीकरणासाठी विमानाने देशपरदेशात जाणं सवयीचं झालं असलं तरी या भूमिकेमुळे खरोखरच एका वैमानिकाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? खरोखरच असं विमानाचं अपहरण झालं तर वैमानिक कशा प्रकारे परिस्थिती सांभाळतो, याची जाणीव झाली. त्यामुळे एकूणच हा खूप वेगळा अनुभव ठरल्याचंहीविजयने सांगितलं.