२००३ साली प्रदर्शित झालेला ‘इश्क विश्क’ हा चित्रपट तरुणाईला भावला. शाहीद कपूर, अमृता राव, शहनाझ आणि विशाल मल्होत्रा हे चारही नवोदित कलाकार या चित्रपटात होते. लहानपणीपासूनच्या मैत्रीतून फुललेलं प्रेम आणि कॉलेजच्या मनमोकळ्या वातावरणात स्वत:ला वेगळं सिद्ध करण्यासाठी केलेलं प्रेम यात गोंधळलेल्या तरुणाची कथा या चित्रपटात होती. मैत्री की प्रेम या जांगडगुत्त्यातून उमललेली साधारण तशीच गोष्ट मात्र आजच्या तरुणाईच्या नजरेतून सांगण्याचा प्रयत्न निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘इश्क विश्क रिबाऊंड’ चित्रपटात करण्यात आला आहे. निपुणच्या वास्तवदर्शी शैलीतील मांडणीमुळे तथाकथित बॉलीवूडी प्रेमकथांपेक्षा अधिक खोली असलेली कथा चित्रपटात आहे, मात्र तरीही एकसंध प्रभाव पाडण्यात चित्रपट कमी पडतो.

खऱ्या प्रेमाचा शोध हा प्रत्येक पिढीतील तरुणाईसाठी गोंधळाचाच विषय. ‘इश्क विश्क रिबाऊंड’मध्ये हा गोंधळ मांडताना तीन घट्ट मैत्री असलेल्या व्यक्तिरेखांभोवती कथा गुंफण्यात आली आहे. राघव (रोहित सराफ), सान्या (पश्मिना रोशन) आणि साहिर (जिब्रान खान) या तिघांची लहानपणापासूनची घट्ट मैत्री आहे. मात्र एकमेकांबरोबर मोठे होत असताना सान्या आणि साहिरची मैत्री प्रेमात बदलली आहे. त्यांची सततची प्रेमातली भांडणं अनुभवायला, ती सोडवायला आणि सगळं पुन्हा नीट करायला राघव असतोच. कॉलेज, घर सगळीकडे प्रेमाचं वातावरण अनुभवणाऱ्या राघवला अजून प्रेम गवसलेलं नाही. एका क्षणी रियाच्या (नायला ग्रेवाल) रूपाने राघवच्या आयुष्यातही प्रेमाचा अंक सुरू होतो. पण सान्या-साहिरच्या भांडणात सतत सान्याला सावरण्यासाठी सुरू असलेली राघवची धडपड. यामुळे त्याच्या प्रेमकथेला बसणारे धक्के एकीकडे आणि दुसरीकडे सान्याला प्रेमभंगातून बाहेर काढण्याच्या नादात त्या दोघांमधली मैत्री संपून सुरू झालेलं प्रेमाचं नातं असा भलताच जांगडगुत्ता होऊन बसतो. प्रेमाच्या या गुंत्याची हलक्या फुलक्या पद्धतीने मांडणी करत नव्या पिढीचा प्रेमपट रंगवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

हेही वाचा >>>“…तर मुलीचं नाव श्रेयाचं ठेवेन”, श्रेया बुगडेला मनोरंजन क्षेत्रात झाली २७ वर्षे, सांगितला खास किस्सा

‘इश्क विश्क रिबाऊंड’ हे नावातच असल्याने वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘इश्क विश्क’शी त्याची तुलना होणं साहजिक आहे. त्याची कथा साध्या-सोप्या आणि बॉलीवूड मसाला नाट्यमय शैलीने जाणारी अधिक होती. गोंधळलेपण तेव्हाही होतं, मात्र आत्ताची पिढी फक्त गोंधळलेली नाही. त्यांचा सगळ्या गोष्टींकडे अगदी नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे भिन्न आहे. प्रेमात पडणं आणि प्रेमभंगाच्या दु:खातून बाहेर पडून नव्या कोणाशी तरी जोडून घेणं हे आत्ताशा खूप किचकट राहिलेलं नाही, किंबहुना सहजपणे एका नात्यातून दुसऱ्या नात्याचा चटकन स्वीकार करणारी तरुणाई अधिक पाहायला मिळते. तरीही इथे तरुणाईच्या भावविश्वाची उथळ मांडणी लेखकांच्या चौकडीने आणि खुद्द दिग्दर्शकानेही केलेली नाही. चित्रपटाचं लेखन डॉ. विनय छावल, वैशाली नाईक, केतन पाडगावकर, आकर्ष खुराणा या चौघांच्या बरोबरीने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी केलेलं आहे. लेखक आणि दिग्दर्शक या सगळ्यांच्या एकत्रित विचारमंथनातून उतरलेल्या या पटकथेत चारही व्यक्तिरेखा खूप ठोस पद्धतीने आणि स्वतंत्ररीत्या उत्तम उभ्या राहिल्या आहेत. मात्र त्यांची गोष्ट पडद्यावर पाहताना बव्हंशी ती राघव आणि सान्याभोवती अधिक घुटमळते. रियाचं पात्र अगदीच अध्ये-मध्ये डोकावतं. त्यातल्या त्यात साहिरची व्यक्तिरेखाही ठाम भूमिका घेताना दिसते. सान्या आणि साहिरच्या नात्यातील गुंता कसा सुटत गेला हेही कळतं. पण राघवच्या गोंधळलेपणाचं कारण वा साहिरशी बिनसल्यानंतर चटकन सान्याचं राघवच्या प्रेमात पडणं या दोन्ही गोष्टींमागची कारणमीमांसा फार वरवर पाहायला मिळते. चित्रपटाची लांबी कमी असल्याने काही ठिकाणी घाई करत गोष्ट पुढे सरकल्याचं जाणवत राहतं. त्यामुळे कोणाचीच प्रेमकथा मनावर पुरेशी पकड घेत नाही.

पटकथेतले हे कच्चे दुवे मांडणीत सातत्याने जाणवत राहतात. पण त्यामुळे खूप नुकसान होऊ नये याची दक्षता काही प्रमाणात चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयामुळे घेतली गेली आहे. रोहित सराफचा सहज अभिनय आणि कुठल्याही भूमिका निभाऊन नेण्याची त्याची ताकद याआधीही प्रेक्षकांनी अनुभवलेली आहे. इथे त्याला सूत्रधारही बनवलं आहे. त्याची कथा त्याच्याच तोंडून ऐकायलाही मिळते आणि समोर घडतानाही दिसते. हा नवीन प्रयोग नसला तरी इथे जमून गेला आहे. रोहितच्या एकूण व्यक्तिमत्त्वात निरागसपणा आणि प्रगल्भता यांचं मिश्रण आहे, त्याचा अचूक आणि पुरेपूर वापर दिग्दर्शकाने राघवच्या भूमिकेसाठी करून घेतला आहे. साहिरच्या भूमिकेत फार कमी प्रसंग जिब्रानच्या वाट्याला आले असले तरी त्याने ते उत्तम निभावले आहेत. किंबहुना अनेक ठिकाणी जिब्रान रोहितला तोडीस तोड टक्कर देऊ शकतो हेही जाणवल्याशिवाय राहात नाही. नायला ग्रेवालचा अभिनय आणि तिच्या वाट्याला आलेली भूमिका दोन्ही उत्तम आहे, पण तिला पडद्यावर वावच मिळालेला नाही. पश्मिना रोशन हा चेहरा अगदी नवीन आहे. पश्मिनाच्या वाट्याला सान्याची मुख्य भूमिका आली आहे, पडद्यावर तिची भूमिका मोठी आहे, पण तिला त्याचा फारसा उपयोग करून घेता आलेला नाही. चौघांबरोबर सुप्रिया पिळगावकर, आकर्ष खुराणा, शिल्पा तुळसकर, शीबा चढ्ढा अशी नामी कलावंत मंडळी पडद्यावर आसपास वावरताना दिसतात. त्यांचा प्रभाव निश्चितच जाणवतो. सान्या, राघव आणि साहिरच्या आई-वडिलांची गोष्ट, त्यांचे स्वभाव या गोष्टींचा मुख्य कथेच्या पार्श्वभूमीवर सुरेख वापर केला आहे. पण या एकूणच मांडणीला कमी वेळ मिळाला आहे, त्या तुलनेत ज्या प्रेमकथेला सर्वाधिक वेळ मिळाला आहे तिचा प्रभाव कमी पडतो आणि हाती काही फार लागत नाही. पटकथेवर अधिक मेहनत घेतली असती तर जुन्या प्रेमकथेला मिळालेला हा नवाकोरा उजाळा पडद्यावर जसा सुंदर उतरला आहे तसाच अर्थपूर्णही ठरला असता.

इश्क विश्क रिबाऊंड

दिग्दर्शक – निपुण अविनाश धर्माधिकारी

कलाकार – रोहित सराफ, पश्मिना रोशन, नायला ग्रेवाल, जिब्रान खान, शिल्पा तुळसकर, आकर्ष खुराणा, सुप्रिया पिळगावकर.