२०१७ मध्ये चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यातील घराणेशाही या मुद्द्यावरील वाद चांगलाच गाजला होता. करणच्या ‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी चॅट शोमध्ये घराणेशाहीच्या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांवर बरीच चिखलफेक केली होती. मात्र, आता काही दिवसांपासून या दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. एका कार्यक्रमामध्य करणने अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा कंगनावर टीकास्त्र सोडलं आहे.”करण जोहरसारखे चित्रपट दिग्दर्शक बॉलिवूडमधील घराणेशाहीला कायम प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे या कलाविश्वामध्ये नव्या व्यक्तींना त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही”, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यांनंतर या दोघांमध्ये आद्यपही शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा हे दोघ संधी मिळाली की एकमेकांवर चिखलफेक करत असतात. अशाच एका कार्यक्रमामध्ये करणने अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी करणने भुवन बाम यांच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये “तुम्हाला घराणेशाही या संकल्पनेविषयी काय वाटतं ?” असा प्रश्न करणला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने कंगनासोबतच्या वादावर अप्रत्यक्षरित्या प्रकाश टाकला.

“घराणेशाहीविषयी मला काही वाटत नाही. मी मुळात ही संकल्पनाच मानत नाही. मात्र काही लोकं अशी आहेत ज्यांना या शब्दावर विशेष प्रेम आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टींमध्ये त्यांना या शब्दाची आठवण होते आणि ते यावरुन वादाची परिस्थिती निर्माण करतात”, असं करण यावेळी म्हणाला. विशेष म्हणजे करणचं हे वक्तव्य थेट कंगनाला टोला असल्याचं साऱ्यांच्याच लक्षात आलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी “कंगना तिच्या मुलांना चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी मदत करेल का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. “मात्र माझ्या मुलांनी स्वत: हा प्रयत्न करावेत”, असं उत्तर कंगनाने दिलं होतं. ‘मणिकर्णिका’ सुपरहिट ठरल्यानंतर कंगना आगामी ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटानंतर ती लवकरच ‘जयललिता’ यांच्या बायोपिकमध्येही झळकणार असून या चित्रपटासाठी तिने तब्बल२४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारले आहे.