Kargil Vijay Diwas 2019 : भारतीय सैन्यदलाने आजवर बरीच युद्ध लढली. त्यातील काही युद्ध अशी आहेत जे देशातील नागरिकांच्या आणि परराष्ट्रांच्याही लक्षात राहिली. त्यातलंच एक युद्ध म्हणजे कारगिल युद्ध. १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यादरम्यान कारगिल युद्ध झालं. ज्यानंतर या दोन्ही देशांमध्ये असणारी सर्वच समीकरणं बदलून गेली होती. सैन्यदलात सेवेत असणाऱ्या बऱ्याच जवानांना या युद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशवासियांनीसुद्धा जवानांचे हे ऋण लक्षात ठेवले आणि पावलोपावली ते फेडण्याचा प्रयत्नही केला. कलाविश्वातही या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट साकारण्यात आले आहेत. ज्यामध्ये कारगिल युद्धाची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारगिलशी हे बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे, असं म्हणायला हरकत नाही. अशा या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथानक साकारले गेलेले चित्रपट खालीलप्रमाणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

LOC कारगिल (२००३)- जे.पी. दत्ता दिग्दर्शित या चित्रपटातून कारगिलच्या युद्धावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. संजय दत्त, आयुब खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन आणि इतरही बरेच कलाकार झळकले होते. पाकिस्तानच्या सैन्यविरोधी कारवाईला सामोरं जातेवेळी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या पराक्रमांची गाथा या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. खऱ्या बोफोर्सचा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वापर करण्यात आला होता. तर त्यात युद्धाची दृश्य ही युद्धाच्याच वेळची संग्रहित दृश्य होती.

धूप (२००३)- कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यरच्या कुटुंबाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरलं होतं. शहिदाच्या कुटुंबियांना शासनाकडून घोषित केलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी कशा प्रकारे पायपीट करावी लागते याचं चित्रण अतिशय प्रभावीपणे या चित्रपटातून करण्यात आलं होतं.

स्टंप्ड (२००३)- क्रिकेट विश्वचषक आणि कारगिल युद्धाच्याच दिवसाचा आधार घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन हिने सैन्यदल अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती, जिचा पती युद्धादरम्यानच बेपत्ता होतो. या चित्रपटाच्या एकंदर कथानकामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती.

लक्ष्य (२००४)- फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सैन्यदलात लागणारी शिस्त, जवानांचं आयुष्य याच्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या चित्रपटाच्या वेळी सर्वात उंचावरुन क्रेनच्या सहाय्याने एका दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. लडाखमधील तंग्लांग्ला पास (समुद्रसपाटीपासून १७ हजार ५८२ फुट उंची) येथे २४ फुटी क्रेनच्या सहाय्याने या दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं.

टँगो चार्ली (२००५)– या चित्रपटाच्या शेवटच्या भागातील दृश्य ही कारगिलच्या युद्धावरच आधारित होती. भारताच्या सीमांत भागांध्ये सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारला होता.

मौसम (२०११)- कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘मौसम’ हा चित्रपट साकारण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kargil vijay diwas 2019 bollywood films that depicted the war on the big screen ssj