दूरचित्रवाहिन्या व चित्रपटाच्या पडद्यावर किंवा नाटकात प्रेक्षकांना कलाकारांचा जो चेहरा पाहायला मिळतो तो त्याच्या मूळ चेहऱ्यापेक्षा कितीतरी वेगळा असतो. तो जसा आहे त्यापेक्षा वेगळा किंवा त्या भूमिकेची गरज म्हणून जसा आवश्यक आहे तसा दाखविला जातो. प्रेक्षकांना रंग लावलेले कलाकार पाहायला मिळतात पण त्यामागे असणारे हात आणि चेहरा अपवाद वगळता फारसा लोकांसमोर येत नाही. ते हात आणि चेहरा दुर्लक्षितच राहतो. जादुई हातानी अनेक दिग्गज कलाकारांचे चेहरे रंगविले व पडद्यामागचा ‘चेहरा’ असलेले ज्येष्ठ रंगभूषाकार आणि ‘चेहऱ्याचे किमयागार’ कृष्णा बोरकर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या अकराव्या वर्षांपासून ‘रंगभूषाकार’ म्हणून बोरकर यांचा प्रवास सुरू झाला. आता वयाच्या ८५ व्या वर्षांत असलेल्या बोरकर यांनी वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करली असली तरी मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या अभ्यासक्रमात ते आजही ‘रंगभूषा’ हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवितात. तसेच आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी करून देतात. बोरकर कुटुंबीय खरे तर गोव्यातील बोरी गावचे. पण पोर्तुगीजांच्या काळात काही मंडळींनी तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले.

लहानपण आणि सुरुवातीच्या काळातील आठवणी जागविताना बोरकर म्हणाले, ‘माझ्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले. आई मला व माझ्या बहिणीला घेऊन मुंबईत आली. तो १९३८-३९ चा काळ होता. आम्ही मुंबईत सिद्धिविनायक मंदिराजवळील कलकत्तावाला चाळीत राहात होतो. सुरुवातीला काही दिवस माझी रवानगी माझे मुंबईतच राहणारे चुलतकाका व ज्योतिषी बोरकर यांच्याकडे झाली. पण नंतर मी पुन्हा कलकत्तावाला चाळीतच आईपाशी राहायला आलो. आमच्या घराशेजारी नाटकासाठी पडदे रंगविण्याचे काम करणारे पांडुरंग हुले राहात होते. मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. ते कसे काम करतात ते पाहायचो. माझी आवड लक्षात घेऊन ते मला एक दिवस दामोदर हॉलमध्ये एका नाटकाला घेऊन गेले. तिथे नाटकासाठी हुले सांगतील तसे मी काम केले. त्या कामाचा मोबदला म्हणून मला आठ आणे मिळाले. माझ्या दृष्टीने ते मोठे अप्रूप होते. त्यांच्याबरोबर काम करत असतानाच मला नाटकाबद्दल आवड निर्माण झाली. यातून ‘सूडाची प्रतिज्ञा’ या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकासाठी मला स्वतंत्रपणे रंगभूषा करायची संधी मिळाली. मी तेव्हा अवघा ११ वर्षांचा होतो. पण स्वतंत्रपणे काम करण्याचा तो अनुभव मला खूप काही शिकवून गेला आणि मी अधिकाधिक या क्षेत्राकडे ओढला गेलो. पुढे काही वर्षे भुलेश्वर येथे विविध प्रकारचे ड्रेस भाडय़ाने देणाऱ्या एका दुकानात काम केले. तिथे तेव्हा असलेले हे एकमात्र मराठी माणसाचे दुकान होते. महाराष्ट्र नाटक कंपनीचे वेषभूषाकार कमलाकर टिपणीस यांच्यामुळे एका चित्रपटासाठीही रंगभूषेचे काम केले.

कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली. पुढे ‘राजकमल’मध्येच साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काही काळ त्यांनी नोकरी केली. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ ‘मौसी’ आदी चित्रपटांसाठी त्यांना साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘राजकमल’ सोडायचे ठरविले व ते शांताराम बापूना भेटायला गेले. ‘नोकरी सोडून चालला आहेस. आता कुठेही साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करू नकोस. उत्तम काम कर आणि काही अडले, गरज लागली तर पुन्हा ‘राजकमल’मध्ये ये’, अशा शब्दांत शांताराम बापू यांनी पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिल्याची आठवण बोरकर यांनी मनाच्या कोपऱ्यात अद्यापही जपून ठेवली आहे. ‘राजकमल’चीच निर्मिती असलेल्या व केशवराव दाते दिग्दर्शित ‘शिवसंभव’ या नाटकासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून काम केले.

पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘पृथ्वी गोल आहे’ हे बोरकर यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्यासमवेत त्यांनी ‘नाटय़संपदा’मध्ये काम केले. पुढे ‘नाटय़संपदा’मधून मोहन वाघ बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘चंद्रलेखा’ची स्थापना केली. नंतर बोरकर यांनी ‘चंद्रलेखा’च्या ‘गारंबीचा बापू’पासून ‘चंद्रलेखा’मध्ये ‘रंगभूषाकार’ म्हणून अनेक वर्षे काम केले. ‘चंद्रलेखा’च्या ‘गरुडझेप’, ‘स्वामी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘रमले मी’, ‘दीपस्तंभ’ ‘गगनभेदी’ ‘रणांगण’ आदी नाटकांसाठी बोरकर हेच रंगभूषाकार होते. ‘रणांगण’ नाटकातील १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. ‘रंगशारदा’ ‘श्री रंगशारदा’ या नाटय़संस्थांमधूनही त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले.  केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे , मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली आहे.

रंगभूषा म्हणजे नेमके काय? असे विचारले असता बोरकर म्हणाले, रंगभूषा म्हणजे केवळ चेहऱ्याला रंग लावणे नाही. सुंदर दिसणे म्हणजेही रंगभूषा नाही. तर नाटकाच्या संहितेप्रमाणे आणि त्या भूमिकेची गरज असेल त्यानुसार त्या कलाकाराचा चेहरा तयार करणे म्हणजे खरी रंगभूषा आहे. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात मी मधुकर तोरडमल यांना केलेल्या रंगभूषेची विशेष चर्चा झाली. माझ्या आजवरच्या रंगभूषाकार कारकीर्दीतील ती एक वेगळी रंगभूषा ठरली. या नाटकासाठी मला रंगभूषेसाठी ‘नाटय़दर्पण’चा ‘मॅन ऑफ दी इयर’ हा पुरस्कार मिळाला होता. ‘सुख पाहता’ या नाटकात अभिनेते यशवंत दत्त यांना मी सहा वेगवेगळ्या भूमिकेसाठी रंगभूषा केली होती. अभिनेते सुधीर दळवी हे ‘साईबाबा’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्या चित्रपटासाठी सुधीर दळवी यांना सुरुवातीला (ट्रायल मेकअप)मीच रंगभूषा केली होती. रंगभूषाकाराने नाटय़संहितेचे वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. लेखकाने ती व्यक्तिरेखा कशी मांडली आहे त्यावर विचार करून त्या भूमिकेला अनुरूप अशी रंगभूषा करणे आवश्यक आहे. त्याने तालमीला उपस्थित राहून स्वत:चा म्हणून काही विचार केला पाहिजे.

अलीकडेच बोरकर यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद यांच्यासह अन्य विविध संस्थानीही बोरकर यांचा सन्मान केला आहे. पत्नी कल्पना, तीन पुत्र, सुना आणि नातवंडे असा बोरकर यांचा परिवार. आजवरच्या आयुष्यात प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही. खोटे बोलायचे नाही हे माझे ब्रीदवाक्य आहे. मिळेल ते काम मग ते छोटे असो किंवा मोठे नेहमीच जीव ओतून केले. आयुष्यात पैशांच्या मागे कधी लागायचे नाही, हे तत्त्व आजवर पाळले. त्यामुळेच मी आयुष्याच्या या टप्प्यावर समाधानी आणि आनंदी असल्याचे बोरकर यांनी गप्पांचा समारोप करताना सांगितले.

आपला चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक निर्मात्याने आपल्या चित्रपटाबरोबरच दुसऱ्याचा चित्रपटही चांगल्या पद्धतीने प्रदर्शित होईल, याची काळजी घेतली पाहिजे. एकमेकांशी सामंजस्याने चर्चा करून प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन व्हायला हवे. आमचा चित्रपट ‘बघतोस काय, मुजरा कर’ ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, १७ फे ब्रुवारीलाही दोन मराठी चित्रपट म्हणजे संपूर्ण फेब्रुवारीत सहा ते सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर दुसरीकडे आता ‘झी स्टुडिओज’च्या ‘ती सध्या काय करते’नंतर एकही मोठा मराठी चित्रपट जानेवारीत नाही. हे नियोजन बदलले पाहिजे.    –   संजय छाब्रिया

मराठीत रोजच्यारोज चित्रपट निर्मिती करणारे जे निर्माते आहेत त्यांना कुठली कथा लोकांना आवडेल, याचे ज्ञान असते. शिवाय, किती बजेटमध्ये चित्रपट बनवायचा हा अनुभव गाठीशी असल्याने त्या आर्थिक शिस्तीतच चित्रपट निर्मिती केली जाते, जेणेकरून त्यांचं नुकसान होत नाही.  त्यांचे चित्रपटही चांगले चालतात. गेल्या वर्षी ‘नटसम्राट’, ‘सैराट’, ‘वायझेड’, ‘वजनदार’, ‘हाफ तिकीट’, ‘व्हेंटिलेटर’सारख्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. हिंदीतून जे निर्माते आलेत त्यांनाही तिथल्या चित्रपटनिर्मितीचा अनुभव असल्याने त्यांना फारसे नुकसान सहन करावे लागणार नाही.   –  नानूभाई जयसिंघानी