रेश्मा राईकवार 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरीच नवरा हवा.. असा आग्रह अचानक गावाकडच्या आणि शहरातल्या तरुणी म्हणू लागतील इतकं या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य एका चित्रपटातून पोहोचेल हे सहजसोपं नाही. मुलीच्या सुखासाठी महिन्याला एकरकमी पगार असलेल्या मुलाशीच लग्न करून द्यायचं हा पालकांचा हट्ट अगदीच निर्थक म्हणून मोडीत काढता येणारा नाही. आणि शेतीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्या, हवालदिल झालेले शेतकरी या परिस्थितीमुळे सुशिक्षित तरुणांनी शेतीच करायची नाही आणि शेतकरी मुलगा नकोच हा मुलींचा अट्टहासही प्रश्न सुटण्यापेक्षा त्यातला गुंता अधिक वाढवणारं आहे. या विषयावर वास्तव शैलीत पण अगदी ठोस उत्तर सापडलं आहे असा अभिनिवेश न आणता सोप्यात सोप्या आणि रंजक पद्धतीने भाष्य करण्याचा प्रयत्न ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

 ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ या नावातच चित्रपटाचा विषय सामावलेला आहे. मुळात या विषयावरचा चित्रपट पाहण्याची संधी मिळणं हाच सुखावह बदल म्हणायला हवा. ऐतिहासिकपट, प्रेमपट आणि विनोदी चित्रपटांच्या गर्दीत आपल्या अवतीभवती असलेले विषय चित्रपट रूपात पाहायला मिळतात तेव्हा नक्कीच ती मनोरंजनाची पर्वणी ठरते. शेती विषयात बीएस्सीची पदवी घेतलेल्या राजवर्धन ऊर्फ राजाला शेतीत नवनवीन प्रयोग करायचे आहेत. काळय़ा मातीत घाम गाळून उभं राहणारं हिरवंगार पीक हे त्याला सर्जनाचं सुख-समाधान मिळवून देतं. त्यापुढे त्याला इतर नोकरी-व्यवसाय फिके वाटतात. शेतकरी असल्याचा त्याला अभिमान आहे. शेतीविषयीचं त्याचं प्रेम उसनं नाही आणि बेगडीही अजिबात नाही. अशा तरुणाला केवळ शेतकरी असल्यामुळे मुलींकडून आणि तिच्या आईवडिलांकडून नकार मिळतो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत डिलिव्हरी बॉय, सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आणि महिना दहा हजार रुपये पगार कमावणाऱ्या तरुणाशी लग्न करण्याची तयारी दाखवणाऱ्या तरुणी शेती करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला नाकारतात. हा नकार होकारात बदलण्याची ताकद शेतीत मनापासून रमणाऱ्या राजवर्धनसारख्या तरुणांकडेच आहे, हे रंजक आणि तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी केला आहे.

हेही वाचा >>>मृणाल कुलकर्णींनी दिल्या खास ब्यूटी टीप्स; त्यांच्या आवडत्या मेकअपच्या तीन वस्तूंचं नाव घेत म्हणाल्या…

 ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ या चित्रपटाचा विषय आणि त्यातील कलाकार या दोन्ही जमेच्या बाजू ठरल्या आहेत. पूर्वार्धात चित्रपटाची कथा राजाला सांगून येणाऱ्या मुली, त्यांचा नकार ते त्याच्या आयुष्यात सुकन्याचा झालेला प्रवेश हे सगळं हळूहळू संथगतीने मांडत राहतो. कथा पुढे कधी सरकणार? हा विचार सतत मनात डोकावत राहतो. मात्र उत्तरार्धात चित्रपट वेग घेतो. शेतीवरचं प्रेम आणि त्यातील प्रयोग यावर राजाचा विश्वास असला तरी प्रत्यक्षात शेतकरी म्हणून येणाऱ्या समस्यांना त्याचं तोंड देणं, दु:खातून पोळल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी सुरू झालेली त्याची धडपड, सुकन्याने दिलेला पाठिंबा आणि त्यामुळे आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी राजाने केलेले प्रयत्न हा चित्रपटाचा भाग खूप चांगल्या पद्धतीने उतरला आहे. अर्थात, जितक्या सरळ पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात देण्यात आली आहे तितकं ते सोपं नसलं तरी त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेला बदलही सकारात्मक पाऊल ठरू शकतो, या विचारावर चित्रपट पोहोचतो. हे करत असताना वास्तविक पद्धतीने केलेली मांडणी, गावाकडचं आयु्ष्य या सगळय़ाचं प्रभावी चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. राजवर्धनच्या भूमिकेत क्षितिश दाते चपखल बसला आहे. त्याच्या व्यक्तित्वातील निरागस भाव भूमिकेतही उतरला आहे. त्याच्या जोडीला सुकन्याच्या भूमिकेत प्रियदर्शिनी इंदलकरनेही त्याला चांगली साथ दिली आहे. या दोघांबरोबरच मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, हार्दिक जोशी, रमेश परदेशी, नेहा शितोळे या कसलेल्या कलाकारांबरोबरच काही नव्या चेहऱ्यांनीही उत्तम साथ दिली आहे. नेहमीपेक्षा वेगळा आणि रंजक अनुभव देतानाच शहाणा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारा ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ हा चित्रपट चौकटीतील चित्रपटांपेक्षा निश्चितच वेगळा ठरतो.

‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’

दिग्दर्शक – राम खाटमोडे

कलाकार – क्षितिश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, हार्दिक जोशी,  मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, नेहा शितोळे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta entertainmentmarathi movie navardev bsc agri amy
Show comments