लेखक, नाटककार, विचारवंत विजय तेंडुलकर यांच्या एका नाटकाचा मध्य प्रदेशातला प्रयोग रद्द करण्यात आला आहे.  इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनकडून दरवर्षीप्रमाणे मध्य प्रदेशातल्या छत्तरपूर येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आयोजकांना हा महोत्सव रद्द करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणि कारण काय तर तिथल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना विजय तेंडुलकरांच्या ‘जात ही पुछो साधू की’ या नाटकावर आक्षेप होता. त्यांच्या म्हणण्यानुसार हे नाटक हिंदुधर्मविरोधी आणि भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे.

‘जात ही पुछो साधू की’ हे विजय तेंडुलकरांच्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकाचं हिंदी भाषांतर आहे. १९७६ मधल्या या नाटकात नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतून या नाटकाचे प्रयोग नाना यांनी केले होते. हे नाटक साधू अथवा कोणत्याही धार्मिक, आध्यात्मिक विषयावर नसून हा भारतीय शिक्षण संस्था आणि जातव्यवस्था यांचा केलेला उपहास आहे. या नाटकातलं मध्यवर्ती पात्र महिपती पोरपर्णेकर हे स्वतःला “एम.ए. बेरोजगार”असं संबोधत असतं. त्याला नोकरी मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, ती मिळाल्यावर येणारे अनुभव आणि त्याला मिळणारी दुय्यम वागणूक यावर आधारीत आहे. या नाटकात स्वयंघोषित विचारवंत आणि त्यांना महत्त्वाचे वाटणारे विषय यातली भिन्नता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक

नाट्यक्षेत्रातल्या काही ज्येष्ठ मंडळींनी अशा प्रकारे नाट्यमहोत्सवावर बंदी आणल्याच्या विरोधात आपला निषेध व्यक्त केला आहे. अशा प्रकारे नाटक आणि नाट्यमहोत्सव रद्द होणं हे नाट्यरसिकांचं मोठं नुकसान आहे आणि हे नाटक लवकरात लवकर मंचावर यावं यासाठी एक ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला रोहिणी हट्टंगडी, अतुल कुमार अशा ज्येष्ठ कलाकार मंडळींनी पाठिंबा दर्शवला आहे. या नाट्य संस्थेचे मध्य प्रदेशचे सचिव शिवेंद्र शुक्ला यांचं म्हणणं आहे की, या नाटकाचे दिग्दर्शक शंतनू पांडे यांना बजरंग दलाकडून धमक्या येत असूनही त्यांना पोलिस संरक्षण मिळालं नाही. याउलट, बजरंगदलाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र शिव्हारे म्हणतात की, त्यांच्याकडून कोणतीही धमकी देण्यात आली नाही. मात्र, सदर नाटक आणि प्रेम जन्मेजया लिखित ‘बेशरमएव जयते’ या दोन नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात यावे असं निवेदन दिलं होतं.

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

यावर आयोजकांचं म्हणणं आहे की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक पूर्ण वाचलं नाही. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मात्र या नाटकाच्या नावात साधू असण्यावर आक्षेप आहे. त्यावर साधू हा शब्द सज्जन या अर्थानं आल्याचं स्पष्टीकरण नाटकाच्या टीमकडून देण्यात आलं आहे.

तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ या नाटकावरही पूर्वी बरेच आक्षेप घेतले जात होते. शिवसेनेही पूर्वी यापैकी एका नाटकाला विरोध दर्शवला होता.

ह्या मतभेदांमुळे, वादांमुळे नाट्यरसिकांचा मात्र हिरमोड झाल्याचं चित्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhyapradesh bans on vijay tendulkars play vsk
Show comments