बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत झुंड चित्रपट, अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांच्याविषयी सांगितले आहे. यावेळी जितेंद्र जोशी म्हणाला, “आज नागराज मंजुळे विषयी आणि झुंडविषयी तुम्हा सर्वांसोबत बोलायचे आहे. आमचा नागराज हिंदी चित्रपटात येतोय. यात सर्वात आधी हिंदी चित्रपटाचे अभिनंदन.”

“काही दिवसांपूर्वी मी पडलो आणि मला लागलं आणि आज मी लाईव्ह येण्यासाठी चष्मा शोधत होतो. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माझाच चेहरा आहे. हा सध्या विद्रुप दिसतो आहे. इथे जरी मी चेहरा लपवला तरी पण आरशात माझा चेहरा मला बघावा लागतोच. तसेच माझ्या चेहऱ्यावर जखम आहे हे मला माहिती आहे. झुंड हा चित्रपट अगदी तसाच आहे”, असे जितेंद्र जोशीने सांगितले.

“झुंड हा तो चेहरा आहे. अजिबात न लपवलेला…मेकअप नसलेला. हा खरंच एक उत्कृष्ट चित्रपट आहे. मी तीन दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. मला त्यांच्या संपूर्ण टीमला भेटायचे आहे. या चित्रपटात ज्या अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे, तसा बच्चन मी यापूर्वी पाहिला नाही. यात सर्व नवीन मुलं आहेत पण यात सर्वांनी फार छान काम केली आहेत. सर्वांनी आपापल्या मुलांना हा चित्रपट दाखवा. झुंड पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्या माणसाने अमिताभ बच्चनला त्याने काहीही अमिताभ बच्चनगिरी करुन दिलेली नाही. फारच मस्त चित्रपट बनवला आहे. म्हणून मग मी विचार केला की लाईव्ह जाऊ आणि सांगू सर्वांना हा चेहरा म्हणजे झुंड आहे. झुंड पाहताना चित्रपटगृहात अक्षरश: रडू येतं”, असेही जितेंद्र जोशीने म्हटले.

“तुम्ही इतके…”, सलमान खानसोबत लग्न केल्याच्या ‘तो’ फोटो पाहून सोनाक्षी सिन्हा संतप्त

यादरम्यान नागराज मंजुळेदेखील या लाईव्हमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी जितेंद्र जोशींनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. “नागराज मला तुला एक सांगायचं की, तू झुंड बनवलास, त्याला एक मित्र म्हणून, समाजातील एक नागरिक म्हणून, मी जो काही आहे माझ्या बऱ्या वाईट समजासह ते सर्व सोबत ठेवून मी तुझे आभार मानतो. तू हा चित्रपट निर्मिती करुन माझ्यावर, माझ्या मुलीवर आणि आसपासच्या माणसांवर तू उपकार करत आहे.”

“अमिताभ बच्चन यांना अशा रुपात बघण्याची सवय नाही. महानायकाला आणि महामानवाला एकाच फ्रेममध्ये आणलं आहेस. हे तूच करू शकतोस. तू यापुढे दोन किंवा चार जितके चित्रपट बनवं, पण आम्हाला हेच सांग. कारण हे सांगणारा दुसरा कोणीही माणूस नाही”, असेही जितेंद्र जोशी म्हणाला.

जितेंद्र जोशीचे हे कौतुक ऐकून नागराज मंजुळेही भारावून गेला. त्यावेळी नागराज मंजुळे यांना बोलण्यासाठी काहीही शब्द सुचत नव्हते. “तू संवेदनशील अभिनेता आहेस, म्हणून तू केलेलं कौतुक खरं आहे. चित्रपटाचं आणि माझं कौतुक केल्याबद्दल मी आभारी आहे”, अशा शब्दात नागराज यांनी जितेंद्र जोशीचे आभार मानले. त्यानंतर जितेंद्र जोशीने सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन ‘झुंड’ बघा, असे आवाहनही केलं आहे.

सलमान खानने लग्नाच्या बातम्यांना दिला दुजोरा, व्हिडीओ शेअर म्हणाला “खरंच…”!

दरम्यान जेव्हा आमिर खाननं पहिल्यांदा ‘झुंड’ चित्रपट पाहिला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले होते. चित्रपटाबाबत त्यानं अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली होती. “चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. चित्रपटात मुलांनी तर अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. हा चित्रपट पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा तर तुम्ही फुटबॉल केला” असं तो म्हणाला. याशिवाय त्यानं भविष्यात नागराज मंजुळे यांच्यासोबत मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor jitendra joshi get emotional after watch nagraj manjule and amitabh bachchan jhund movie nrp