महाराष्ट्रामधील बऱ्याच भागांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचंही बरंच नुकसान झालं. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तर फळभाज्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी निराश झाले आहेत. अशामध्येच आता अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करत यावर भाष्य केलं आहे.

शेतकऱ्यांचं नुकसान पाहता अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच शेतामधील फोटो शेअर केले आहेत. अमोल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शेतीचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. याबाबतच एक भावुक संदेश त्यांनी लिहिला आहे.

ते म्हणाले, “परतीच्या पावसानं आमच्या शेतातील पीक भुईसपाट झालं. काळजात चर्रर्र प्रत्येकाच्या होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला की दुःख सगळ्यांना होतं. पण काहींना रडण्याची मुभा नसते. तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलुख गमावूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीत दाखवला तो स्वाभिमान आणि लढावू वृत्ती! तेव्हा संकट सुलतानांचं होतं आता अस्मानीसुलतानी!”

आणखी वाचा – “मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

“पण इतिहास केवळ वाचून, सांगून चालत नाही तो अंगी बाणवावा लागतो. जेव्हा लढणं रक्तात असतं तेव्हा रडणं हद्दपार करावंच लागतं.” या पोस्टमध्ये अमोल यांनी त्यांच्या शेतीचं नुकसान झालं असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच इतर शेतकऱ्यांचीही व्यथा मांडली आहे.