ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. काल तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत सापडले. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. ते गेल्या काही महिन्यांपासून आंबी गावातील त्यांच्या घरी भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील एक काळ गाजवला होता. मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. परंतु एक काळ असा होता, ज्यावेळी ते मोठ्या कर्जात बुडाले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी याने शालेय वयात त्यांचं सगळं कर्ज फेडलं होतं.
आणखी वाचा : “कायम हसतमुख आणि…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सुबोध भावेने जागवल्या जुन्या आठवणी
अभिनेते म्हणून काम करत असतानाच अभिनयाव्यतिरिक्त आपला इतर काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशिप केली. परंतु, या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यांच्या घरावरही जप्ती आणली गेली. त्यावेळी गश्मीरची आई नोकरी करत होती, परंतु त्यांचा पगार खूप नव्हता. ही सगळी परिस्थिती पाहून गश्मीरने कुटुंबाला हातभार लावायचा निर्णय घेतला.
गश्मीरने वयाच्या पंधराव्या वर्षी त्याची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली. त्याबरोबरच तो नाटक, चित्रपटांमध्ये मिळेल त्या भूमिका करू लागला. दोन वर्षांमध्ये गश्मीरचा त्याच्या डान्स अकॅडमीवर चांगला जम बसला आणि गश्मीरने त्याच्या कुटुंबावर असलेलं कर्ज फेडलं.