मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे त्यांच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. आपल्या सहज अभिनयाने कलाकृतीला न्याय देण्याचे काम हे कलाकार करीत असतात. त्यामुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग तयार होतो. अशा कलाकारांपैकी एक अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे हे आहेत.

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्वत:च्या अभिनयाची छाप प्रेक्षकवर्गावर निर्माण केली आहे. ‘सरकारनामा’, ‘वास्तव’, ‘सातच्या आत घरात’, ‘सावरखेड : एक गाव’, ‘खबरदार’, ‘शुभमंगल सावधान’, ‘कापूस  कोंड्याची  गोष्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत मराठी सिनेमाच्या व्यवसायाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मकरंद अनासपुरे यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत मराठी सिनेमाच्या व्यवसायाविषयी बोलताना त्यांनी म्हटले, “दिवसा किंवा अगदी दररोज नाटक होत नाही. चार-चार प्रयोग होत नाहीत. तिथे सिनेमापण दाखवा आणि ४० रुपये, ३० रुपये, असा तिकीट दर ठेवा. एसटीचा ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर मला केल्यानंतर मी त्या भाषणातही बोललो होतो की, तालुका लेव्हलचे जे एसटी डेपो आहेत तिथे मिनी प्लेक्स करा. ५०-१०० कॅपॅसिटीचे आणि २० रुपये, ४० रुपये असे तिकीट ठेवा. लोक बघतील ना.” त्यावर अमोल परचुरे यांनी, “हे मी २०१२ पासून ऐकतोय”, असे म्हटले.

हेही वाचा: Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?

त्यावर पुढे बोलताना मकरंद अनासपुरे यांनी म्हटले, “बघ १२-१५ वर्ष झाली. आपण बांधलंय ते. त्यातून आऊटपुट यायला पाहिजे. हे इतकं साधं आहे. मराठी सिनेमा जास्तीत जास्त ठिकाणी २० रुपये, ४० रुपये, ५० रुपये या दरांत पाहायला मिळाला, तर मराठी सिनेमाचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.”

हेही वाचा: “…अन् कार दुभाजकावर आदळली”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला अपघाताचा घटनाक्रम; म्हणाला, “माझ्या मुलाला वाटलं मी मेलो”

दरम्यान, मकरंद अनासपुरे अभिनय क्षेत्राबरोबरच मकरंद अनासपुरे यांचा सामाजिक कार्यातदेखील योगदान आहे. २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. याद्वारे ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करतात.