लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (४ जून २०२४ रोजी) जाहीर झाले. या निवडणुकांच्या निकालात भाजपप्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या, तर काँग्रेस व इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकांच्या निकालांवर राजकीय नेते व सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेता रितेश देशमुखने दिवंगत वडील व काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महाराष्ट्राचे दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख काँग्रेसबद्दल बोलत आहेत. काँग्रेस संपवणं अशक्य आहे, असं ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा होत आहे.

“अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा…”, भाजपा उमेदवार हरल्याने ‘रामायण’मधील लक्ष्मणची नाराजी

रितेश देशमुखने शेअर केलेला हा व्हिडीओ दिवंगत विलासराव देशमुख यांच्या भाषणाचा आहे. या व्हिडीओत ते काँग्रेसला त्याग व बलिदानाचा इतिहास असल्याचं म्हणतात. “लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले पण काँग्रेस संपली नाही. एवढा प्रचंड इतिहास ज्या काँग्रेसला आहे त्यागाचा, बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे ती काँग्रेस अशी कुणाच्या संपवल्याने संपू शकत नाही,” असं विलासराव देशमुख व्हिडीओत म्हणाले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्रीने प्रचार करूनही हरले तिचे बाबा, पराभवानंतर पोस्ट करत म्हणाली, “ज्यांनी माझ्या वडिलांवर…”

“काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. आजही काँग्रेस म्हणते ‘काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ’, जी काँग्रेसची भूमिका आहे आम आदमी म्हणजे सामान्य माणूस…काँग्रेसचे हात केवळ श्रीमंतांबरोबर आहे असं नाही म्हटलं काँग्रेसने..आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस ही भूमिका काँग्रसने स्वीकारली. महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं. कालपर्यंत ३३ टक्के आरक्षण होतं आता ५० टक्के झालं. आता ५० टक्के आमच्या भगिनी जिल्हा परिषद, नगर परिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात मानाचं स्थान मिळवून देण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागत आहे, आश्वासनाच्या बळावर नाही. बाकीचे लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत. काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामाच्या बळावर मतं मागत आहे. उजळ माथ्याने तुमच्यासमोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसकडे आहे,” असं या व्हिडीओत विलासराव देशमुख म्हणाले आहेत.

राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”

रितेश देशमुखने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अभिनेता सुनील शेट्टी व अनिल कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.